(मुंबई)
भारतीय रेल्वेने ट्रेन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि बुकिंग प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी हे बदल करण्यात आलेत. आज शनिवार 1 मार्च 2025 पासून लागू होणाऱ्या या नवीन नियमांचा उद्देश प्रवाशांना उत्तम सेवा प्रदान करणे असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेच्या नवीन नियमांमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे अॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड (ARP) १२० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत कमी केले आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या यात्रेचे अधिक अचूक नियोजन करण्यास मदत करेल. बहुतेक प्रवासी त्यांच्या प्रवासाचे नियोजन दोन महिन्यांपेक्षा जास्त आधी करत नाहीत, त्यामुळे हा कालावधी व्यावहारिक दृष्टिकोनातून अधिक योग्य ठरणार आहे.
आतापर्यंत अनेक प्रवासी वेटिंग तिकीटवर रिझर्व्हेशन डब्यात प्रवास करत होते. यामुळे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना गर्दीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे प्रशासनाने आता वेटिंग तिकीट केवळ जनरल डब्यात मान्य असेल, असा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, वेटिंग तिकीट असलेले प्रवासी केवळ जनरल डब्यात प्रवास करू शकणार आहेत. परंतु जर कोणी वेटिंग तिकीटवर रिझर्व्हेशन डब्यात प्रवास करताना आढळल्यास त्यांना AC कोचसाठी ४४० रुपये तर स्लीपर कोचसाठी २५० रुपये दंड भरावा लागणार आहे.
प्रवाशांना अंतिम क्षणी तिकीट मिळवून देणाऱ्या तत्काल तिकीट बुकिंग सुविधेतही भारतीय रेल्वेने बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार तत्काल बुकिंगसाठी वेळ विभागणी करण्यात आली आहे. याआधी सर्व प्रकारच्या तत्काल तिकिटांसाठी एकाच वेळी बुकिंग सुरू होते. मात्र आता AC क्लाससाठी सकाळी १० वाजता तर नॉन-AC क्लाससाठी सकाळी ११ वाजता तत्काल बुकिंग सुरू होईल.
दरम्यान, तत्काल तिकिटांच्या किंमतींमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता प्रवासाच्या अंतरावर तिकीट किंमत लागू असणार आहे. तथापि, तत्काल तिकिटांवर किमान आणि कमाल मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेने रिफंड पॉलिसीमध्ये देखील लक्षणीय बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार प्रवाशांना ट्रेन रद्द झाल्यास संपूर्ण तिकीट रक्कम परत मिळेल. तसेच ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त उशीरा धावल्यास प्रवाशांना पूर्ण रिफंड मिळू शकेल. तसेच यापूर्वी प्रवासी त्यांचे प्रवासाचे नियोजन बदलल्यास रिफंड मिळवू शकत होते, परंतु आता ही सुविधा मर्यादित केली गेली आहे. नवीन नियमांनुसार प्रवासापूर्वी २४ तासांपेक्षा जास्त काळात रद्द केल्यास ५० टक्के रिफंड मिळू शकणार आहे. प्रवासापूर्वी १२-२४ तासांच्या दरम्यान रद्द केल्यास २५ टक्के रिफंड मिळणार आहे. तर प्रवासापूर्वी १२ तासांपेक्षा कमी वेळेत रद्द केल्यास रिफंड मिळणार नाही.
परदेशी पर्यटकांसाठी भारतीय रेल्वेने विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांच्यासाठी अॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड (ARP) ३६५ दिवस कायम ठेवण्यात आला आहे. तसेच परदेशी पर्यटकांना विशेष पर्यटक कोटा देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रत्येक ट्रेनमध्ये काही निवडक सीट्स राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि देशात अधिक परदेशी पर्यटक येतील.