(मुंबई)
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान मुंबईच्या नौदल गोदीत आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी व आयएनएस वाघशीर या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करणार आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. ज्यामध्ये नौदलाच्या तीन युद्धनौकांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. तसेच नवी मुंबईतील एका इस्कॉन मंदिराचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी करणार आहेत. दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील .
तीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजे कार्यरत करणे ही संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृष्टीकोनातून घेतलेली एक उत्तुंग झेप आहे. आयएनएस सूरत, P15B हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथे आणि सर्वोत्तम जहाज असून, जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यातील 75% सामग्री स्वदेशी असून अत्याधुनिक शस्त्र-सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी ते सुसज्ज आहे.
आयएनएस निलगिरी, हे P17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकारातील पहिले जहाज असून भारतीय नौदलाच्या युद्धनौका (Warship) डिझाईन विभागाने त्याची निर्मिती केली आहे, तसेच त्यात उत्कृष्टपणे संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता असून सागरी सुरक्षा (सीकीपिंग) आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत, जे स्वदेशी फ्रिगेट्सच्या आधुनिक प्रकाराचे प्रतिबिंब दर्शवितात.
आयएनएस वाघशीर, P75 स्कॉर्पीन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी असून,पाणबुडी बांधणीतील भारताच्या वाढत्या कौशल्याचे ती प्रतिनिधित्व करते. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात मुंबईमध्यचे महायुतीच्या आमदारांसोबत स्नेहभोजन करणार असून त्यांच्याशी ते संवाद साधणार असल्याचे समजते. मुंबईच्या नेव्ही डॅाकयार्डच्या कॅंम्पसमध्ये मुख्यमंत्री, राज्याचे मंत्रिमंडळ आणि महायुतीच्या आमदारांसोबत पीएम मोदींच स्नेहभोजन पार पडणार आहे. यावेळी भाजपचे पदाधिकारीही पंतप्रधान मोदींसोबत स्नेहभोजन घेणार आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.