(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आरोपीची उलट तपासणी न करण्यासाठी लाच मागितल्याने खेडमधील सरकारी वकिलाला चिपळूणमध्ये लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना गुरुवारी दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. राजेश देवराव जाधव, (विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी ) असे लाचखोर वकीलाचे नाव आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात वकीलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूण येथील ओयासीस हॉटेल येथे तक्रारदार यांच्याकडून राजेश देवराव जाधव याने एकूण ५,००,००० ( पाच लाख ) रुपयांची लाच मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता १,५०,००० (दिड लाख) रुपयांचा लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. तक्रारदार यांनी घरडा कंपनीच्या केसमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वर्ग १, खेड यांचे न्यायालयात वकीलपत्र घेतले आहे. सरकार पक्षाच्यावतीने सदरची केस श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता हे पाहात होते.
दिनांक २६ डिसेंबर २०२४ व दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक राजेश जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे साक्षीदारांना शिकवणार नाही, तुमची केस कशी सुटेल, असे प्रयत्न करेन, जास्त उलट तपास न घेता महत्वाचे मुद्दे वगळून आरोपी निर्दोष कसे सुटतील व केस लवकर संपवायला मदत करण्यासाठी ५,००,००० रुपयांची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता १,५०,००० रू. स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झालेले होते. त्यानंतर गुरुवारी दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. या रचलेल्या सापळ्यात लोकसेवक राजेश जाधव यांना तक्रारदार यांच्याकडून १,५०,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचखोरीला आळा घालण्याचे एसीबीसमोर आव्हान
या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासनातील लाचखोरीला आळा बसावा, म्हणून शासनाने प्रत्येक राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत केला. केंद्रीय पातळीवर दक्षता आयोगही स्थापन केला. पण, लाचखोरी कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे. मात्र लाचखोरीला आळा घालण्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागासमोर हे एक मोठं आव्हान आहे. या प्रकरणात तर सरकारी वकिलाला रंगेहाथ पकडल्याने आता काय म्हणावं, अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रीया जनमानसात उमटत आहेत.