(दापोली)
राज्यात कमी पट संख्येमुळे अनेक शाळा बंद होत असून, शाळा आणि शिक्षक यांच्या अस्तित्वासाठी झगडण्याची चळवळ सुरूच ठेवावी लागेल. संचमान्यता, शिक्षक भरती, केंद्रप्रमुख बढती आदि विषयांचा आढावा घेत अखिल भारतीय शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे यांनी काल दापोली येथे जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर यांच्या सेवापूर्ती सदिच्छा कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त केले. अखिल शिक्षक संघटनेच्या वाढीसाठी रमाकांत शिगवण आणि प्रवीण काटकर यांचे योगदान कोणीही विसरु शकत नसल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
शिक्षक नेते रमाकांत शिगवण यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या सेवापूर्ती सदिच्छा सोहळ्यासाठी दापोलीचे प्रांत अजीत थोरबले, बि.डी.ओ. गणेश मंडलीक, श्री.कल्याण लवांडे सरचिटणीस, अखिल भारतीय शिक्षक संघ, अमरावती विभाग अध्यक्ष दिगंबर जगताप सर, तसेच शिक्षक नेते बबन बांडागळे, दिपक शिंदे, दिलीप महाडिक, सतीश सावर्डेकर, गोताड सर, मुश्ताक तांबे, हिदायत नाईक, शिक्षण विभागातील सर्व विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिक्षकांचे विश्वासाचे स्थान, प्रत्येकाच्या मनामनात घर करणारे नेतृत्व म्हणजे प्रवीण काटकर असे गौरवोद्गार प्रांत अजित थोरबले यांनी तर उमदं आणि जाॅली व्यक्तीमत्व असलेले काटकर सर यांच्या कार्यमग्नतेमुळेच ते ४० वर्षे यशस्वी सेवा करु शकले असे बि.डी.ओ. गणेश मंडलिक यांनी सन्मानपूर्वक मत व्यक्त केले. तर काटकर यांच्या १९८९ मधील एका तासाच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनाला कलाटणी मिळाल्याचे संजय मेहता यांनी सांगितले.
यावेळी दिलीप देवळेकर यांची संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे बस्वदे यांनी जाहीर केले. तर शिक्षक हा फक्त विद्यार्थ्यांचाच नसतो; तर तो समाजाचाही शिक्षकच असतो, असे लवांडे यांनी सांगत,काटकरांची अखिलशी जुळलेली नाळ कधीही तुटणार नसलेची ग्वाही दिली. तर माणसं जोडत गेलो, माणूसकी जपत राहिलो. कुटूंबाची चांगली साथ लाभल्यामुळेच चांगली सेवा घडू शकली असे गौरवमुर्ती काटकर यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात शिक्षक नेते रमाकांत शिगवण यांनी उपस्थित जनसमुदाय पाहून, केलेल्या कामाला लोक किती दाद देतात ही त्याची पोचपावती असल्याचे सांगितले तर शिक्षक बंधू म्हणून जे प्रेम मिळाले. फक्त कर्तृत्व आणि विश्वास यामुळेच लोक आमचेशी जुळत गेले. कर्तृत्व आणि स्वभाव यामुळे संघटनेची जडणघडण होत गेली; आणि आज जिल्ह्यात सर्वत्र अखिल संघटनेची मूळे खोलवर घट्ट रुजलेली पहायला मिळत असल्याबद्दल त्यांनी काटकर यांना धन्यवाद देत, दोघेही संघटनेच्या चळवळीत अविरत राहू असे अभिवचन दिले.
यावेळी काटकर यांच्या पत्नी, मुली, अनेक हितचिंतक शिक्षक बंधुभगिणी यांनी मनोगते व्यक्त केली. प्रारंभी पुष्पवृष्टी करीत सुरु झालेला सेवापूर्ती सोहळा, अध्यक्ष विजय फंड यांनी आभार व्यक्त करीत समारोप केला.सुत्रसंचालन वैभव बोरकर यांनी केले. अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाच्या सर्व शिलेदारांनी कार्यक्रम यशस्वी होणेसाठी प्रयत्न केले.