(रत्नागिरी / प्रतिनिधी)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत अपशब्द वापरून अपमान केला होता. या घटनेचा भारतभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसपाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी, दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी तीव्र निदर्शने करून निषेध व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत देखील निषेध असो निषेध असो, अमित शहांचा निषेध असो! अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमुख व महत्वाच्या सहा मागण्यांचे राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले..
सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, गेल्या 5000 वर्षांपासून आपल्या देशातील सुरु असलेल्या मनुवादी व्यवस्थेमुळे आपल्या देशातील नागरिकांचे शोषण होत आहे. त्यामुळे मनुवादी व्यवस्थेने भारतीय जनतेला जिवंतपणातच नर्क भोग दिला. अश्या समाजात बाबासाहेब जन्माला आलेत. त्यांनी या मनुवादी व्यवस्थेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी काय परिश्रम घेतले, काय काय हाल अपेष्टा सहन केल्या, हा इतिहास या देशातील सर्व नागरिकांना माहीत आहे आणि संविधानाच्या माध्यमातून या समाजाला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, दर्जाची व संधीची समानता राष्ट्राची एकता आणि एकात्मता, बंधुभाव निर्माण होईल असे संविधानात लिहीले आणि वर्ण व्यवस्था, जुलमी मनुवादी व्यवस्था मोडून या देशातील प्रत्येक नागरिकाला समान केले.
तसच भारतातील संपूर्ण नागरिकांना बाबासाहेबांनी मिळवून दिलेल्या हक्क अधिकारामुळे जिवंतपणे याच जन्मात स्वर्ग मिळाला. त्यामुळे आंबेडकर यांचं नाव घेणं हे पॅशन आहे (अभिमान आहे; अतिशय आवड आहे; तीव्र भावना आहे). त्यामुळे संपूर्ण देश त्यांचं आदराने नाव घेतात, त्यांचा सन्मान करतात. सम्पूर्ण देशातील नागरिकांच्या हृदयात बाबासाहेब आहेत. हे सर्व माहीत असून सुद्धा दि. 17/12/2024 रोजी संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संसदेत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी जाणीव पूर्वक आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेची थट्टा उडवत “आज आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, म्हणण्याची फॅशन झाली आहे. एवढं आंबेडकर यांचं नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर, सात जन्म स्वर्ग प्राप्त झाला असता” असे वक्तव्य केलं.
तसेच, भारतीय संविधानाने धर्मस्वातंत्र्याचा व अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे, त्यामुळे कोणाला कोणाचं नाव घ्यायचं आहे आणि किती वेळा घ्यायचा हा वैयक्तिक अधिकार आहे. त्यामुळे आंबेडकरांचं नाव घेणं बंद करा, आणि देवाचं नाव घ्या अश्या अर्थाने अप्रत्यक्ष बोलणे अत्यंत निंदनीय आहे. त्यांच्या मते लोकांनी आंबेडकर यांचं नाव घेणं बंद करावं आणि देवाचं नाव घ्यावं. म्हणजे ज्या व्यक्तीने भारतीय जनतेला याच जन्मात स्वर्ग तयार करून दिला. त्यांचं नाव घेणं बंद करावं आणि देवांचे नाव घ्यावं असा त्या वक्तव्याचा अर्थ निघतो. या वक्तव्यातून अमित शहा यांचा खरा मनुवादी चेहरा जनतेला दिसला, त्यांच्या पोटातलं जहर ओठांवर आलंच, तसेच त्यांच्या मनातील आंबेडकरांबद्दल व आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेबद्दलचा राग, चीड, द्वेष स्पष्ट दिसून आले. त्यामुळे संपूर्ण भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
अमित शहांनी जाहीर माफी मागावी…
अमित शहा यांनी बाबासाहेब यांच्यामुळेच देशातील नागरिकांना जिवंतपणातच स्वर्ग मिळाला. आणि आपण संविधानाचं पालन प्रामाणिकपणे केलं तर अंनत पिढ्यांना हा स्वर्ग मिळेल असं म्हणत जाहीर माफी मागावी व पश्चताप म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी बहुजन समाज पार्टी तर्फे करीत आहोत. माफी न मागितल्यास बहुजन समाज पार्टी तर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा ही इशारा निवेदनातून राष्ट्रपतींना देण्यात आला आहे.