(संगमेश्वर / एजाज पटेल)
जीवाणूजन्य रोग हे बहुतेक वेळा हिवाळ्यात पसरतात. कारण हवेतील आर्द्रता त्यांचे पुनरुत्पादन सुलभ करते. म्हणून या दिवसांत निरोगी आणि पौष्टिक अन्न खाणे आरोग्यास हितकारक असते.
जेणेकरून या जीवाणूविरुद्ध शरीर त्याचा सामना करण्यासाठी एक ढाल तयार करू शकेल. त्यामुळे सर्व आजारांपासून वाचवणारे अन्न म्हणजे मासे होय. मासे थंडीच्या दिवसांमध्ये ताजे तवाणे असतात. त्यामुळे नागरिक हिवाळ्यात मासे खाणे अधिक पसंत करतात. एकीकडे माशांची मागणी वाढली असताना, दुसरीकडे मात्र आवक कमी असल्याने बाजार भाव सुद्धा चांगलेच वधारले आहेत. तरी मासे शौकीन महाग का असेना बाजारात जाऊन मासे खरेदी करत आहेत. खवय्ये घरगुती, हॉटेल, स्टॉल आदी ठिकाणी माशांवर ताव मारताना दिसून येत आहेत.
थंडीचा कडाका वाढल्याने शरीरासाठी पौष्टिक सकस, आहार घेणे गरजेचे असते हिवाळ्यात शरीराची भूक वाढून पचनक्रिया सुधारते. या दिवसांत मेथीचे लाडू, बदाम, काजू, अक्रोड, फळे, अंडी आदींचे सेवन केले जाते. त्याचबरोबर अनेक जण मासे खाण्यास तसेच खाडीतील खेकडे खाणे पसंत करतात कारण खेकडा खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम मध्ये वाढ होते असे म्हटले जाते.
संगमेश्वर येथे दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार, फुणगूस, आरवली, कडवई, देवरुख येथे भरणाऱ्या आठवडा बाजारात तसेच रविवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी रत्नागिरी, चिपळूण, हर्णे येथून तर गावच्या काही ठिकाणी खाडीतील ताजे मासे विक्रीला आणले जातात.
शहर ठिकाणी भरणाऱ्या आठवडा बाजारात सुरमई, रवू, पापलेट, सरंगा, बोंबिल आदी प्रकारचे समुद्र मासे तर तांबोस, पालू, कानई, खेकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात.हिवाळ्यात मास्यांना मांगणी प्रचंड असल्याने व बाजारात पाहिजे त्या प्रमाणात मासे उपलब्ध होत नसल्याने माश्यांचे दर चांगलेच वधारले आहेत.