(लांजा)
भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीबाहेर काढण्यात यश आले. या बिबट्याला वन विभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी लांजा शहरातील लिंगायतवाडी येथे घडला.
लिंगायतवाडी येथील जितेंद्र तथा राजू रामचंद्रन लिंगायत यांची घराशेजारी विहीर आहे. पहाटे ५:३० वाजण्याच्या दरम्यान विहिरीत काहीतरी पडल्याचा त्यांना आवाज आला. मात्र, पावसामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले. सकाळी जितेंद्र यांची पत्नी सीमा यांनी विहिरीचा पाण्याचा पंप सुरू केला असता गढूळ पाणी आले. पावसामुळे गढूळ पाणी आले असावे, असे त्यांना वाटले. त्यानंतर देवपूजेसाठी विहिरीशेजारी फुले काढण्यासाठी त्या गेल्या असता विहिरीवर टाकलेले कापड विस्कळीत झाल्याचे लक्षात आले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी याबाबत घरातील लोकांना सांगितले. त्यानंतर लांजा वन विभागाशी संपर्क साधून त्यांना माहिती देण्यात आली.
परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, लांजाचे वनपाल सारीक फकीर, एम. जी. पाटील, वनरक्षक बाबासाहेब ढेकळे, सिद्धार्थ हिंगमेटे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आधी रस्सीच्या सहाय्याने विहिरीत मोठा लाकडी पाट सोडला. त्या लाकडी पाटावर बिबट्या येऊन बसला. त्यानंतर पिंजरा सोडून नागरिकांच्या मदतीने बिबट्याला चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यात जेरबंद करून विहिरीबाहेर काढण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.