(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरानजिक कोकणनगर येथील रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. या भागातील किर्तीनगर येथे बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दोन दुचाकीवरून तीन ट्रॅफिक पोलिस अचानक आले अन् धडाधड गाड्यांचे फोटो त्यांनी काढले. गाड्या पार्क करून दुकानात गेलेल्या वाहन चालकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर लगेचच वाहनचालक आपल्या गाडीजवळ धावत आले. आजूबाजूचे वाहनधारक आणि नागरिकही काही सेकंदात एकत्रित जमले आणि आलेल्या ट्रॅफिक पोलिसांना काही प्रश्न विचारले.
कीर्तीनगर भागात एका ईमारतीखाली प्रसिद्ध मलबार हॉटेल आहे. या हॉटेलच्या आजूबाजूला दवाखान्यासह अन्य छोटे-मोठे व्यवसाय करणारे गाळेधारक आहेत. मात्र दवाखान्यासह दुकानात येणाऱ्या वाहनांना गाड्या पार्क करण्यास इतर ठिकाणी जागा नसल्याने गाळ्यांच्या समोरच्या जागेत विनाअडथळा गाड्या पार्क केल्या जातात. पार्क केलेल्या गाड्यांचा कोणालाही त्रास आजपर्यंत झालेला नाही. तसेच या भागात गाड्या पार्क करण्यासाठी जागाच नसल्याचेही तेथील नागरिक सांगतात. मात्र बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक दोन दुचाकीवरून तीन ट्रॅफिक पोलिस दंडात्मक कारवाई करण्याच्या हेतूने किर्तीनगर परिसरात दाखल झाले. ट्रॅफिक पोलिसांनी आपल्या मशीनद्वारे तिथे पार्क केलेल्या गाड्यांचे काही क्षणातच धडाधड फोटो काढले. ट्रॅफिक पोलिसांना पाहून दवाखान्यात किंवा आजूबाजूला गेलेले नागरिक आपल्या गाडीजवळ लगेचच धावत आले. येथील वाहनधारकांनी पोलिसांसमोर काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर आमच्याकडे तक्रार आल्याचे पोलीस सांगत होते.
त्यानंतर या प्रकाराची कोकणनगर येथील काही प्रतिष्ठित नागरिकांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. तत्काळ तेथील प्रतिष्ठित नागरिकही घटनास्थळी दाखल झाले. तुम्हाला तक्रार दिली तर कोणी तक्रार दिली असे विचारल्यानंतर पोलीस केवळ तक्रार दिली हेच सांगत होते. त्यानंतर प्रतिष्ठीत नागरिकांनी आलेल्या तिन्ही ट्रॅफिक पोलिसांना येथील परिसराची माहिती समजावून सांगितली. गाड्या रस्त्याच्या बाजूला उभ्या आहेत. परंतु येथील गाळेधारकांना कोणतीही पार्किंगची व्यवस्था नाही. विनाअडथळा गाड्या पार्क केल्या तरीही कारवाई होणार असेल तर मग गाड्या पार्क करणार कुठे ? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. तसेच कारवाई करण्यापूर्वी तोंडी सूचना द्याव्यात किंवा नो पार्किंगचे बोर्ड लावावेत, असे देखील नागरिकांनी पोलिसांना सांगितल्यानंतर तेथील काही जणांना दुसऱ्या दिवशी वाहतूक शाखेच्या ऑफिसला येण्यास सांगून तिथून पोलीसांनी काढता पाय घेतला.
ट्रॅफिक पोलीसांकडून वाहनचालकांना दिला जातोय त्रास?
शहरात वाहतूक नियमांचे पालन केले नाही तर वाहतूक पोलीसांकडून चलन कापून दंड आकारला जातो. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ट्रॅफिक पोलिसांना तैनात करण्यात येत असते. परंतु पोलीस ज्या भागात ड्युटी करतात तिथे देखील मशिनद्वारे फोटो काढून वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. साळवी स्टॉप येथे दोन किंवा तीन ट्रॅफिक पोलिस उभे असतात. मध्यंतरी या ट्रॅफिक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईने रत्नागिरीकर त्रस्त झाले होते. ट्रॅफिक पोलिसांच्या वाढत्या तक्रारीमुळे पालकमंत्री सामंत यांनी ठोस भूमिका घेऊन शहरात हेल्मेट सक्ती करु नका अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी ही दंडात्मक कारवाईची मोहीम थांबवली. मात्र ट्रॅफिक पोलिस मशिनद्वारे फोटो काढून दंडात्मक कारवाई करून वाहनचालकांना त्रास देत असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. अशा घटनांमुळे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे.