( रत्नागिरी )
नवीन प्रकल्प येण्यास ग्रामस्थांचा विरोध नाही, मात्र दलालांना पाठीशी घालून; इथल्या जैवविविधतेला, शेतीला आणि जीविताला हानी पोहोचवून प्रकल्प थोपवू पाहत असेल तर या प्रकल्पाविरोधात न्यायालयीन लढाई व वेळ पडल्यास रस्त्यावरची लढाई लढू, असा इशारा खंडाळा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथील प्रस्तावित एमआयडीसीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध कायम आहे. याबाबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे रत्नागिरी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संस्थेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रथमेश गावणकर, सचिव केदार चव्हाण, ॲड. महेंद्र मांडवकर व वाटद, मिरवणे, कोळीसरे, कळझोंडी, गडनरळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्याच्या उद्योग विभागाने वाटद परिसरातील प्रस्थापित ५ गावांना उद्योग क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. यामध्ये २५०० एकर जमीन संपादित केली जाणार असून, त्यापैकी बहुतांश जमिनी याआधीच परप्रांतीयांकडून कवडीमोल दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने लगेचच १५ दिवसांत संबंधित शेतकऱ्यांना ३२ २ खाली जागा संपादित करण्यासाठी नोटीस काढण्यात आल्या. या नोटीस हातात मिळताच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. एकंदरीत कोणत्याही प्रकल्पासाठी जागा संपादित करायची असेल तर नियम १९६१/१ अन्वये अधिसूचना काढण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना लेखी सूचना दिली पाहिजे. परंतु, तशी कोणतीही सूचना न देता केवळ या प्रक्रियेत आर्थिक लागेबांधे जपण्यासाठी या जमिनी मोठ्या प्रमाणात दलालांच्या माध्यमातून परप्रांतीयांच्या घशात घालून स्थानिकांना देशोधडीला लावण्याचे काम प्रशासन करीत आहे का, असा प्रश्न करण्यात आला आहे.
या जमिनीवर नक्की कोणता प्रकल्प येणार किंवा त्याचे स्वरूप कसे असणार आहे, याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आलेला नाही किंवा तशी माहिती संबंधित यंत्रणा द्यायला तयार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. या प्रकल्पामुळे येथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात विस्थापित व्हावे लागेल, असे सांगून या प्रकल्पाला विरोध केला आहे.