(रत्नागिरी / प्रतिनिधी)
छत्रपती संभाजी महाराजांच्या पट्टराणी कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्य संकटात असताना अत्यंत धीरोदात्तपणे अनेक संकटांचा सामना केला. अशा कर्तुत्ववान महाराणी येसूबाई यांचे माहेर असलेल्या श्रृंगारपूर (ता. संगमेश्वर) येथे भव्य स्फूर्तिस्थळ व्हावे, या मागणीसाठी साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी श्रृंगारपूरचे सरपंच विनोद पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अठरापगड जातीच्या लोकांनी आपल्या जिवाचे रान केले. त्यातील राजेशिर्के व इतरही अनेक घराण्यांशी खुद्द शिवरायांची सोयरीक होती. यापैकीच एक राजेशिर्के घराण्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पट्टराणी महाराणी येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्य संकटात असताना अत्यंत धीरोदात्तपणे संकटांचा सामना केला, छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांचे रक्षण केले.
तब्बल २९ वर्षे त्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या नजरकैदेत होत्या. बंदीवासातही त्यांनी शाहू महाराजांवर उत्तम संस्कार केले आणि कर्तृत्वान राजा घडवला. मात्र, येसूबाईंचे हे कर्तृत्व इतिहासाच्या पानांमध्ये झाकोळले गेले आहे. या कर्तुत्ववान सम्राज्ञीचे समाधीस्थळ लोकस्मृतीतून नष्ट व्हावे ही दुर्दैवाची बाब आहे, असे उपोषणकर्ते सुहास राजेशिर्के यांनी सांगितले. राजधानी सातारा येथील इतिहास संशोधकांनी येसूबाईंचे समाधिस्थळ शोधून काढले असून त्याच्या संवर्धनासाठीचा पाठपुरावा आम्ही सातत्याने करत आहोत, असेही ते म्हणाले.
येसूबाई यांचे माहेर असलेले श्रृंगारपूर हे गावदेखील अजूनही दुर्लक्षित आहेत. कधीकाळी या गावात त्यांच्या पितृकुल राजेशिर्के घराण्याचा फार मोठा वाडा येथे होता, सरंजाम होता. परंतु या घडीला त्याचे भग्नावशेष मिळणे दुर्मीळ झाले आहे. अशा या विस्मृतीत गेलेल्या श्रृंगारपूर या गावी त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे स्फूर्ती स्थळ उभे राहावे, म्हणून इतिहास संवर्धनासाठी सत्याग्रह म्हणून बेमुदत उपोषण सुरू केल्याचे राजेशिर्के यांनी सांगितले.