(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कित्येक वर्षांपासून सुरू असलेले मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे हातखंबापासून लांजापर्यंत ठिकठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रुंदीकरण व काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर पसरवलेली खडी वाहनचालकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असतानाही संबधित ठेकेदार कंपनी वाहनचालकांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लांजा – पाली – हातखंबा या मार्गावर दिवस-रात्र प्रचंड वर्दळ असते. हातखंबा पाली भागात सध्या ईगल कंपनीमार्फत काम करण्यात येत आहे. ठेकेदार कंपनी बदलल्याने ईगल कंपनीने काम हाती घेतल्यानंतर समस्या सोडवण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. ठेकेदार कंपनीने तुकड्यात चौपदरीकरणाच्या मार्गिका तयार करून त्यावरून वाहतूक सुरू केली आहे. मात्र याच मार्गिकेवरून जात असताना डायव्हर्जन केलेल्या ठिकाणी मोठी खडी पसरवण्यात आली आहे. या खडीवरून दुचाकीचालकांचे वारंवार अपघात होत आहेत. मोठ्या खडीवरून लहान वाहने जाणार तरी कशी? डायवर्जन केलेल्या ठिकाणी बारीक खडीचा वापर करणे आवश्यक असताना मोठ्या खडीचा वापर करून ठेकेदार कंपनीने लोकांच्या जीवाशी खेळ सुरू केलाय का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
ठेकेदार ईगल कंपनीच्या बेफिकिरीमुळे पाली ते लांजा भागात रुंदीकरण करून काँक्ट्रिकरण केलेल्या रस्त्यावर दररोज दुचाकी खडीवरुन घसरुन अपघात होत आहेत. खडीचा अंदाज येत नसल्याने रात्रीचा प्रवास हा वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. काँक्रिटीकरण केलेल्या मार्गिकेवर पसरलेली खडी बाजूला करण्याबाबत स्थानिक नागरिक कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगत असतात. मात्र त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यावरून ठेकेदार कंपनीची बेफिकिर वृत्ती अधोरेखित होते. जिल्हा प्रशासन, महामार्ग प्राधिकरण किंवा लोकप्रतिनिधी यापैकी कोणाचे याकडे फारसे लक्ष नसल्याने ठेकेदार आपल्या सोयीनुसार काम करीत आहे. सर्वांचा हा निष्काळजीपणा लोकांच्या जीवावर बेतण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ठेकेदार कंपनीने भानावर येऊन कामे करावी. अन्यथा…
लांजा ते पाली या पट्ट्यातील तुकड्यात केलेल्या चौपदरीकरणाच्या मार्गिकेवर डायवर्जन करण्यात आले आहेत. डायवर्जन केलेल्या ठिकाणीच मोठी खडी पसरवली आहे.ही खडी वाहनचालकांना डोकेदुखी ठरतेय. दुचाकीस्वरांचे दररोज अपघात होतायत. काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाहनचालकांच्या जीवाशी खेळू नये, ठेकेदार कंपनीने भानावर येऊन कामे करावी. अन्यथा कंपनीलाच भानावर आणावे लागेल.
– अनिरुद्ध कांबळे, काँग्रेस जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष