(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक विद्यार्थी आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून, देशभरात गाजलेल्या विविध स्पर्धा परीक्षांच्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवला आहे. या अत्यंत संवेदनशील राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरुद्ध विद्यार्थ्यांनी पुकारलेला हा लढा खऱ्या अर्थाने निर्णायक ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्त केला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राजीनामा दिल्याची माहिती दिली. शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या महिनाभरापासून जंतर मंतरवर सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्याचे म्हंटले जात आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दिल्लीतील या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रासह अनेक राज्यात पसरले होते. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढून केंद्र सरकाविरोधात असंतोष वाढत चालला होता. तसेच गेल्या आठवड्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे केंद्र सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत होती त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी काही वेळा पुर्वी सोशल मिडीयावर पोस्ट करत आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यास व करिअर बनवण्यावर घालवावा, याच विचाराने मी माझा राजीनामा मा. पंतप्रधानांकडे पाठवून दिला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी काय म्हंटले आहे?
माझ्या तरुण सहकाऱ्यांनो, मी गेल्या ४ दशकांपेक्षा जास्त काळापासून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित राहिलो आहे. एक सशक्त, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्थाच एका सशक्त राष्ट्राची पायाभरणी असते, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे.
मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील तरुण पिढीची स्वप्ने साकार करणे हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प राहिला आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली राष्ट्रसेवा करण्याची जी संधी मला मिळाली, त्याबद्दल मी मा. पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो.
परंतु, ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG च्या परीक्षेत अनियमितता आढळून आली. भारत सरकारने याची तत्काळ दखल घेत तपास सीबीआयकडे (CBI) सोपवला, परीक्षा रद्द केली आणि पुनरुपरीक्षेची तारीख घोषित केली. यासोबतच पुढच्या वर्षापासून ही परीक्षा सीबीटी (Computer-based-test) मोडमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कालावधीत २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडावी, ही आमची मुख्य प्राथमिकता होती. यासाठी ‘संपूर्ण सरकार दृष्टिकोन’ (whole of government approach) ठेवून काम करण्यात आले. यामध्ये भारत सरकारसोबतच राज्य सरकारे, विशेषतः जिल्हा प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. तसेच विद्यार्थी, पालक आणि माता-पित्यांच्या सहकार्याने २१ जून २०२६ रोजी ही परीक्षा पूर्ण झाली.
पहिल्या दिवसापासूनच मी याची जबाबदारी घेतली आणि या परिस्थितीपासून कधीही तोंड लपवले नाही. परीक्षा माफियामुळे आपण कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याची शक्यता खराब होऊ देणार नाही, कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, हा माझा संकल्प होता.
१६ जुलै रोजी घोषित झालेला नीट-यूजीचा (NEET-UG) निकाल समाधानकारक राहिला, ज्यामध्ये गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनाही यश मिळाले. परंतु या कालावधीतही अनेक विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्यासाठी जबाबदार पदांवर बसलेल्या व्यक्तींनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मन अत्यंत व्यथित झाले.
मी नेहमीच आपल्या लोकशाहीच्या ताकदीवर अढळ विश्वास ठेवणारा राहिलो आहे आणि तरुणांच्या आकांक्षा, स्वप्ने व अपेक्षांचा मनापासून आदर करत आलो आहे. ते केवळ भारताचे भविष्यच नाहीत, तर एका नव्या आणि विकसित भारताचे वाहक, निर्माते आणि भविष्याचे शिल्पकारसुद्धा आहेत.
गेल्या १० दिवसांचा घटनाक्रम पाहून माझे मन दुःखी आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही. भारताची युवाशक्तीच या देशाची खरी ताकद आहे. देशाच्या युवाशक्तीला भ्रमाच्या चक्रव्यूहात फसू देणार नाही, हाच माझा संकल्प आहे.
जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी फायदा घेऊ नये, देशाची एकता कायम राहावी, भारतातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणींत अडकू नये, आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यासात घालवावा आणि करिअर घडवण्यावर भर द्यावा, याच गोष्टीचा विचार करून मी माझा राजीनामा आदरणीय पंतप्रधानांकडे पाठवला आहे.
मी आदरणीय पंतप्रधानांचे मार्गदर्शन, विश्वास आणि सातत्याने मिळालेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच मंत्रिमंडळातील माझे सर्व सन्माननीय सहकारी, मंत्रालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि ज्यांच्यासोबत मला काम करण्याचे सौभाग्य मिळाले त्या सर्व व्यक्तींचेही आभार मानतो. राष्ट्रसेवा ही माझ्या जीवनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मी यासाठी सदैव समर्पित राहीन.
प्रभू श्री जगन्नाथजींच्या आशीर्वादाने मी भविष्यातही भारतमाता, ओडिशाची जनता आणि देशातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांनी स्वतःला समर्पित ठेवीन.
आपला,
धर्मेंद्र प्रधान

