ज्योतिषशास्त्रात पंचक काळ अत्यंत संवेदनशील आणि अशुभ मानला जातो. विशेषतः जेव्हा पंचकाची सुरुवात शनिवार किंवा मंगळवारी होते, तेव्हा त्याला ‘मृत्यू पंचक’ असे म्हटले जाते. यंदा ६ जून २०२६ रोजी शनिवारी संध्याकाळी ७.०३ वाजता मृत्यू पंचकाला सुरुवात होत असून ११ जून गुरुवारी सकाळी ८.१६ वाजता त्याची समाप्ती होणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस अनेकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात दिला आहे.
सनातन हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी पंचांग, तिथी, नक्षत्र आणि मुहूर्त पाहण्याची परंपरा आहे. अशात मृत्यू पंचक काळात ग्रह-नक्षत्रांची स्थिती संवेदनशील मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या काळात निष्काळजीपणा, चुकीचे निर्णय किंवा धोकादायक प्रवास टाळणे आवश्यक असते.
पंचक म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत भ्रमण करतो तेव्हा निर्माण होणाऱ्या कालावधीला पंचक असे म्हणतात. या काळात धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद आणि रेवती ही पाच नक्षत्र येतात. या काळात केलेल्या कार्यांचा प्रभाव अधिक तीव्र असल्याचे मानले जाते.
मृत्यू पंचक का मानले जाते अशुभ?
पंचकाचे पाच प्रकार सांगितले जातात. त्यापैकी शनिवारी सुरू होणारे पंचक ‘मृत्यू पंचक’ म्हणून ओळखले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या काळात विवाह, गृहप्रवेश, वास्तुशांती, नवीन कामांची सुरुवात यांसारखी शुभ कार्ये टाळली जातात. कारण या काळात सुरू केलेल्या कामांमध्ये अडथळे येतात किंवा संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मानले जाते. गरुड पुराणानुसार, मृत्यू पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर संकट येण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे अशावेळी काही विशेष धार्मिक विधी आणि शांतीकर्म केले जातात.
मृत्यू पंचकात कोणते उपाय करावेत?
हनुमान चालीसा आणि बजरंग बाण पठण
मृत्यू पंचकादरम्यान दररोज सकाळ-संध्याकाळ हनुमान चालीसा आणि बजरंग बाणाचे पठण करणे शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, अशी श्रद्धा आहे.
महामृत्युंजय मंत्र जप
भगवान शिवाची पूजा करून शिवलिंगावर काळे तीळ मिसळलेले पाणी किंवा दूध अर्पण करावे. तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. यामुळे अकाली संकटांपासून संरक्षण मिळते, असे मानले जाते.
गायत्री मंत्राचा जप
पाच दिवस नियमित गायत्री मंत्राचा जप केल्याने मानसिक शांतता मिळते आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण होते, अशी धार्मिक मान्यता आहे.
दक्षिण दिशेला प्रवास टाळा
ज्योतिषशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमराजांची दिशा मानली जाते. त्यामुळे मृत्यू पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवास करणे टाळावे. अत्यावश्यक प्रवास असल्यास हनुमानजींना गूळ-चना किंवा फळांचा नैवेद्य दाखवूनच घराबाहेर पडावे.
वाहन चालवताना घ्या विशेष काळजी
या काळात अपघातांची शक्यता अधिक असल्याचे मानले जात असल्याने वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतूक नियमांचे पालन करणे आणि शक्यतो रात्रीचा किंवा लांबचा प्रवास टाळणे आवश्यक मानले जाते.
पंचकात मृत्यू झाल्यास काय करतात?
गरुड पुराणातील मान्यतेनुसार, जर मृत्यू पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कारावेळी कुश किंवा पिठाचे पाच पुतळे तयार करून त्यांचेही विधीपूर्वक दहन केले जाते. यामुळे पंचक दोषाचे निवारण होते, अशी श्रद्धा आहे.
टीप : वरील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य मान्यतांवर आधारित आहे. यास वैज्ञानिक आधार असल्याचा दावा करण्यात आलेला नाही.

