(रत्नागिरी)
जनता सहकारी बँकेच्या (पुणे) शिवाजीनगर शाखेच्या नूतनीकृत वास्तूचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यवाह गजानन करमरकर यांच्या हस्ते एटीएमचे व नवलाई ग्रुपचे संचालक जितेंद्र सावंत यांच्या हस्ते नूतनीकृत शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
गजानन करमरकर व जितेंद्र सावंत यांनी जनता सहकारी बँकेबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. बँकेने ग्राहक, व्यापारी व उद्योजकांना वेळोवेळी दिलेल्या सहकार्याचा विशेष उल्लेख करून बँकेच्या ग्राहकाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले. बँकेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शाखेचे संपर्क संचालक मिलिंद लिमये, संचालक नानासाहेब कांबळे, महाव्यवस्थापक धनंजय सहस्त्रबुद्धे, शाखेचे पालक संदीप गानू (विभाग प्रमुख, प्रशासन विभाग) नियोजन व स्थावर विभागातील राजीव सोनूने, शाखा नूतनीकरण कंत्राटदार आशिष देशपांडे, अॅड. एम. वाय. भिडे, ग्राहक, सभासद, हितचिंतक, माजी सेवक, कोकण विभागातील सर्व शाखा व्यवस्थापक व मान्यवर उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक श्रीराम केळकर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
संचालक मिलिंद लिमये यांनी बँकेच्या गौरवशाली ७६ वर्षांच्या वाटचालीचा आढावा मांडला व आधुनिक बँकिंग सेवांच्या माध्यमातून ग्राहकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बँकेच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. महाव्यवस्थापक धनंजय सहस्रबुद्धे यांनीही बँकेच्या प्रगतीमध्ये ग्राहक, सभासद व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
नूतनीकृत शाखेमुळे ग्राहकांना अधिक आधुनिक, सुसज्ज व दर्जेदार बँकिंग सुविधा उपलब्ध होणार असून उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले. ग्राहकांनी नूतनीकृत वास्तूबाबत समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन कौस्तुभ जोशी यांनी केले. सहाय्यक शाखा व्यवस्थापक प्रकाश केळकर यांनी आभार मानले. शाखेतील अधिकारी सौ. नेत्रा करमरकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सागंता झाली.
दिवसभरात उद्योजक दीपक गद्रे, अनुप मेडिकेअर एलएलपीचे भागीदार, प्रल्हाद लिमये, लोकमान्य को. ऑप. सोसायटी व एसव्हीसी बँकेचे अधिकारी, राजापूर अर्बन बॅंकेचे अधिकारी, संजय पटवर्धन, बबनराव पटवर्धन, नगरसेवक राजू कीर, सीए श्रीरंग वैद्य, सौ. राधिका वैद्य, सौ. कांचन नागवेकर अशा अनेक नामांकितांसह ५०० हून अधिक ग्राहकांनी शाखेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

