(मुंबई)
महाराष्ट्र दिनानिमित्त (1 मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘Missing Link’ प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या लिंकमार्गामुळे मुंबई–पुणे प्रवास सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार असून, इंधनाची 15–20% बचत होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, आमदार उमा खापरे, सुनील शेळके, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, एमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, एमएसआरडीसीचे अधिकारी तसेच या प्रकल्पांतर्गत बोगद्याच्या बांधकामातील सहभागी नवयुगा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
घाटातील वळणांना पर्याय, वाहतूक कोंडी कमी
नव्या मार्गामुळे खंडाळा घाटातील धोकादायक व वळणदार रस्त्याला मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे. अंदाजे 70% वाहतूक या लिंकमार्गावर वळवली जाईल, त्यामुळे कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुसाट होणार आहे. हा मार्ग खोपोली ते कुसगाव (लोणावळा) असा थेट जोडतो. सध्या मुंबई ते पुणे हा प्रवास साधारण 155 किमी असून सुमारे 3 तास लागतात. ‘Missing Link’ सुरू झाल्यानंतर हा वेळ अंदाजे 2 तास 30 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- एकूण खर्च: 6,695 कोटी रुपये
- एकत्र बोगदे:
- पहिला बोगदा – 8.92 किमी (आशियातील लांब बोगद्यांपैकी एक)
- दुसरा बोगदा – 1.75 किमी
- रुंदी: 23.5 ते 23.75 मीटर (जगातील सर्वात रुंद बोगद्यांमध्ये समावेश)
- 8-लेन क्षमता, आधुनिक व्हेंटिलेशन, लाइटिंग आणि आपत्कालीन सुविधा
या बोगद्यांची रुंदी लक्षात घेता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
650 मीटर केबल-स्टे ब्रिज: अभियांत्रिकीचा कमाल
या प्रकल्पात 650 मीटर लांबीचा केबल-स्टे ब्रिज उभारण्यात आला असून तो टायगर व्हॅली परिसरात आहे. पुलाची उंची सुमारे 180 मीटर, तर पायलॉन उंची 182–184 मीटर आहे. हा पूल ताशी 252 किमी वेगाच्या वाऱ्यांनाही तोंड देऊ शकतो, अशी रचना करण्यात आली आहे. याशिवाय 850 मीटर लांबीचा व्हायडक्ट ब्रिजही उभारण्यात आला आहे. या नव्या मार्गामुळे लोहगड किल्ला, विसापूर किल्ला आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.
‘Missing Link’चं नाव बदलणार?
उद्घाटनावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचे नाव बदलण्याचे संकेत दिले. “आता काहीही ‘मिसिंग’ राहिलेले नाही. याला ‘Connecting Link’ म्हणायला हवे,” असे त्यांनी स्पष्ट करत लवकरच नव्या नावाबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे भारतातील पहिला एक्सप्रेसवे अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक बनला असून, मुंबई–पुणे दरम्यानचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे.

