मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांमधील असंसर्गजन्य आजारांवर (एनसीडी) प्रभावी नियंत्रणासाठी नागपूर येथील एम्स, बालरोग विभागासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.
या सामंजस्य कराराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बालकांचे आरोग्य हे राज्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे ही केवळ आरोग्य क्षेत्राची जबाबदारी नसून समाजाची एकत्रित बांधिलकी आहे. या कराराच्या माध्यमातून आपण मुलांसाठी अधिक सुरक्षित, निरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकत आहोत.
हा करार नागपूर येथील एम्स, बालरोग विभागासोबत करण्यात आला असून, या अंतर्गत राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये चाइल्डहूड एनसीडी क्लिनिक्स स्थापन व कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून टाईप-1 मधुमेह, जन्मजात हृदयरोग, दमा, स्थूलता, सिकलसेल, मानसिक आरोग्य आणि विकासात्मक विकार यांसारख्या आजारांचे प्रतिबंध, लवकर निदान आणि प्रभावी उपचार सुनिश्चित करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मानकीकृत उपचार पद्धती, डेटा संकलन प्रणाली आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यावर विशेष भर दिला जाणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून करण्यात आलेले हा सामंजस्य करार पुढील तीन वर्षांसाठी कार्यान्वित असणार आहे. या करारांमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेत गुणवत्ता, उपलब्धता आणि सर्वसमावेशकता वाढवण्यास मोठी चालना मिळणार आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार नाना पटोले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, उपसचिव विलास बेंद्रे तसेच डॉ प्रशांत जोशी, एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक, डॉ. मीनाक्षी गिरीश, बालरोग तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते. एम्स, नागपूर संस्थेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

