(गणपतीपुळे / वैभव पवार)
ईगल फौंडेशनच्या नावाप्रमाणेच अनेक स्त्रिया गरुडझेप घेत असल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, राजकीय आदी क्षेत्रात अत्यंत जबाबदारीने काम करत आहेत. बचत गटासारख्या माध्यमातून सक्षम होत आहेत. त्यामुळे सकारात्मक वृत्ती आणि विधायक दृष्टी ठेवून महिलांनी वाटचाल केली तर त्या यशाला गवसणी घालू शकतात, असे मत रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी व्यक्त केले. त्या मालगुंड येथील कविवर्य केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ईगल फाउंडेशनच्या महिला सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
प्रमुख पाहुण्या रत्नागिरीच्या डी. वाय एस. पी. राधिका फडके म्हणाल्या की, महिलांनी प्रभावीपणे आणि सक्षमपणे काम केले पाहिजे. क्षेत्र कोणतेही असो, स्त्रियांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला पाहिजे. त्यानंतर या कार्यक्रमात कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन तथा आबा पाटील यांनी महिला दिनाची कधी आणि कुठे सुरवात झाली याबद्दल सविस्तर माहिती देऊन महाराष्ट्रात, देशात आणि जगात महिला दिन साजरा होत असताना प्रत्येक पुरुषाने आपल्या घरापासुन महिलांचा आदर आणि त्यांच्या चांगल्या कामाची कदर करावी. स्त्रिया सक्षम झाल्या तरच प्रत्येक घर आणि पर्यायाने देश सक्षम होईल असे स्पष्ट केले.
याबरोबरच जि. प. सदस्या सौ.नेत्रा नवनीत ठाकुर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, राज्य संपर्कप्रमुख बाबासाहेब राशिनकर, कवी स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसाप शाखा मालगुंड अध्यक्षा नलिनी खेर, ईगल फाउंडेशनचे प्रकाश वंजोळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुण्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुछ देवून फौंडेशन च्या पदाधिका-यांनी सत्कार केला.
ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक व कर्तबगार महिलांना रणरागिणी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्यामध्ये सौ. वैदही रानडे (रत्नागिरी ),श्रीमती शैला गंगाधर बैसाणे (जळगाव ), सौ. भाग्यदेवी बाबुराव चौगले (सांगली), सौ. प्रियांका अविनाश नाईक (मुंबई ),प्रा. सौ. सुमेधा सावळ( सिंधुदुर्ग ), सौ. रुपाली विक्रम यादव ( शिराळा), सौ. सुनिता विजय अरगडे (पुणे), श्रीमती सुनिता रविंद्र परमणे (कागल), शोभाताई निवृत्ती होनमाने ( देवराष्ट्रे), प्रा. अश्विनी संजय पाटील ( कराड), ॲड.स्नेहल भिमराव गुरव ( कोल्हापूर ), सौ. व श्री सुलक्षणा आनंदा कांदळकर( राधानगरी ), सौ. सौनल संजोग खातू (रत्नागिरी ), सौ. शुभांगी दामोदर कोंडे, डॉ. सुमिता संजय शिर्के, श्रीमती प्रमोदिनी विठ्ठलराव किनाके (यवतमाळ ), सौ. वर्षा परशुराम ढेकणे, डॉ. किर्ती ऋषिकेश कुलकर्णी यांचा समावेश होता.
या सर्व पुरस्कार प्राप्त महिलांना मानपत्र, सन्मानचिन्ह व कोल्हापूरी फेटा बांधून गौरव करण्यात आला. यावेळी तुतारीच्या निनादाने कार्यक्रमात उत्साह संचारला.
या कार्यक्रमात पत्रकार वैभव पवार, उदय महाकाळ, संकेत ढवळे, सामाजिक कार्यकर्ते संजय शितप, पत्रकार संतोष बांदिवडेकर आदी मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन केलेल्या हनुमंत कदम यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, पदाधिकारी सर्वश्री श्री प्रकाश वंजोळे , श्री बाबासाहेब राशिनकर, श्री दिपक पोतदार, पत्रकार श्री दिनेश कांबळे, पत्रकार श्री विजय जगताप, पत्रकार श्री वैभव पवार, मुख्याध्यापक पांडूरंग नाईक, ईगल न्यूजच्या संपादिका सौ. शालन कोळेकर, सौ. पुष्पावती वंजोळे,सौ. सुलक्षणा राशिनकर आदीनी विशेष परिश्रम घेतले.

