(रत्नागिरी)
देशात एकूण 9 प्रकारचे धनेश आढळतात, त्यातील 4 प्रजाती या पश्चिम घाटात विशेषत: आपल्या रत्नागिरीमध्ये आढळतात. धनेश हा पक्षी अनेक वर्षे जंगलाची शेती करत आहे. त्यामुळे त्याचा अधिवास वाचविणे, त्याचं संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आहे ते राखण, नव्याने रोपण करणं, जंगल वाचवणं याला सर्वांनी प्राधान्य द्यायला हवे, असे आवाहन सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतिक मोरे यांनी केले.
वन विभागाच्यावतीने आयोजित पक्षी मित्र संमेलनामध्ये ‘जंगलाचा शेतकरी’ या विषयावर श्री. मोरे यांनी संगणकीय सादरीकरण करत अत्यंत सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. ते म्हणाले, धनेश हा पक्षी जगातील केवळ अफ्रिका आणि आशिया या दोनच खंडात आढळतो. आफ्रिकेत जमिनीवर राहणारे धनेश आहेत, तर आशियात झाडावर उडणारे धनेश आढळतात. नार्कोंडम हार्न बिल हा अंदमानात आढळतो. जंगलाचे आरोग्य तपासायचे असेल तर धनेशाची संख्या तपासली जाते.
धनेशामध्येही वधु-वरांचे मेळावे भरतात. त्यांचे आयुष्य 50 वर्षे असतं. एकदा जोडी ठरली की नर मादीला आवडणारी फळे भेट देत असतो. ढोलीमध्ये जायच्याआधी त्याची साफसफाई दोघे मिळून करतात. मादी आतमध्ये गेल्यानंतर ढोलीचे दार लिंपण्यासाठी वड, पिंपळ, औदुंबर अशा फळांचा पल्प वापरला जातो. मलबार पाईड हा मातीदेखील वापरुन लिंपण करतो. साठ ते नव्वद दिवस मादी अंडी उबवते. अशावेळी नर मादीसाठी चार ते पाच कि.मी. परिसरात फळे गोळा करुन आणत असतो. सरडे, पाली, छोटे साप यामधून प्रथिने, फळांच्या माध्यमातून पाण्याची कमतरता भरुन काढतो. बेहडा, चांदफळ, काजरा, काजू, उत्रंजीवा, जांभूळ, बकूळ, जंगली काजू, बीबा अशा 48 प्रकारच्या बिया त्याच्या विष्टेतून पाहायला मिळातात. अशा बीजांचा प्रसार 12 कि.मी. परिसरात तो करत असतो.
70 टक्के शाकाहारी तर 30 टक्के मांसाहारी आहे. भेरलीमाड शिमग्यासाठी हवं असेल, तर धनेशाला टिकविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मिश्र शेती करावी लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी ती फायदेशीर आहे. कृत्रिम निवासस्थान, अधिवासांचे पुनर्संचयन, सामाजिक क्लब या माध्यमातून धनेश संवर्धन करावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.
विराज आठल्ये यांनीही ‘सागरी आणि स्थलांतरित होणारे रत्नागिरीतील पक्षी’ या विषयावर सविस्तर माहिती दिली. संगणकीय सादरीकरण करताना खरुची, उलटचोच तुतारी, सामान्य टिलवा, गळाबंद पानलावा, पानटिलवा, तणमोर, संघचारी टिटवी, छोटा चिखला अशा विविध पक्षांबाबत चित्रफित आणि छायाचित्रामधून माहिती दिली.
‘रत्नागिरीतील पक्षांची विविधता’ या विषयावर निकीता शिंदे यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. यात प्रामुख्याने देवराई, पाणथळ, खंड्या, पानकावळा, वटवट्या अशा कितीतरी पक्षांचा समावेश होता.
यावेळी माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर जी. गुरुप्रसाद, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली तुषार चव्हाण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराडचे उपवन संरक्षक किरण जगताप, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी रणजीत गायकवाड, विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते विभागीय वन अधिकारी संजय वाघमोडे, इंद्रजीत निकम, पक्षीतज्ञ भाऊ काटदरे, महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे कार्यवाह प्रा. गजानन वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले पक्षी मित्र, पक्षी संशोधक उपस्थित होते.

