(संगमेश्वर / एजाज पटेल)
“कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही… मुंबई–गोवा महामार्ग झालाच पाहिजे!” “आमदार–खासदार सगळेच चोर… ही तिरडी कशाला? प्रशासनाच्या मयताला!” अशा तीव्र आणि आक्रमक घोषणांनी रविवारी संगमेश्वर येथील सोनवी पुल परिसर आज अक्षरशः दणाणून गेला. गेल्या तब्बल १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविरोधात जनतेचा संयम अखेर संपला असून, जनआक्रोश समितीच्या वतीने महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अपघात, मृत्यू आणि प्रशासनाची उदासीनता
कामातील कुर्मगती, नियोजनाचा अभाव आणि ठेकेदारांचा हलगर्जीपणा यामुळे महामार्गावर सातत्याने भीषण अपघात घडत आहेत. अनेक निष्पाप नागरिकांसह मुक्या जनावरांचे बळी जात असून, गंभीर जखमी, कायमचे अपंगत्व, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास हे या परिसरातील नागरिकांचे रोजचे वास्तव बनले आहे. “अजून किती जीव गेल्यावर शासन आणि प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
महामार्गावर ४ ते ५ किमीपर्यंत वाहतूक कोंडी
आंदोलनामुळे महामार्गावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संगमेश्वर परिसर अक्षरशः पोलीस छावणीत रूपांतरित झाला होता. मात्र प्रशासन व ठेकेदारांच्या उदासीन भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांचा रोष अधिकच तीव्र होत गेला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी उपअभियंता; जनतेचा संताप
आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी केवळ उपअभियंत्याला पाठवण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर झाला. “आमच्या प्रश्नांची दखल घ्यायची असेल तर जबाबदार वरिष्ठ अधिकारीच आले पाहिजेत. अटक झाली, जेलची हवा खावी लागली तरी माघार नाही,” असा ठाम इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
पोलिसांची समजूत, तरीही आंदोलनकर्ते ठाम
पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण व विभागीय पोलीस अधिकारी माईणकर यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम राहिले.
अखेर पोलिसांनी कारवाई करत काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलनकर्ते सोनवी पुलावरच झोपून प्रतिकार करू लागले, तर महिला आंदोलनकर्त्यांनीही महामार्गावर ठाण मांडले. प्रतीकात्मक तिरडी ठेवून घोषणाबाजी सुरूच राहिली.
तासभर महामार्ग ठप्प
सुमारे तासभर महामार्ग पूर्णतः ठप्प राहिला. “सामान्य जनतेला वेठीस धरू नका,” या पोलिसांच्या विनंतीनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे न घेता एका बाजूला तिरडी ठेवून घोषणाबाजी सुरूच ठेवली.
अखेर अधीक्षक अभियंता आंदोलनस्थळी
बराच वेळ तणावानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अनामिका जाधव आंदोलनस्थळी दाखल झाल्या. “पोकळ आश्वासने नकोत. लेखी, ठोस आणि कालबद्ध हमी दिली तरच आंदोलन स्थगित करू,” अशी स्पष्ट भूमिका जनआक्रोश समितीने मांडली.
मार्चमध्ये उड्डाणपूल पूर्ण करण्याचे आश्वासन
अधीक्षक अभियंता अनामिका जाधव यांनी संगमेश्वर येथील उड्डाणपुलाचे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले केले जाईल, तसेच इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ठेकेदारांकडून सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष, निकृष्ट काम आणि हलगर्जीपणावर जोरदार आरोप केले.
चार तासांचा नाट्यपूर्ण संघर्ष
सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. परवानगीशिवाय राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी काही आंदोलनकर्त्यांवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हे दाखल झालेल्यांची नावे
सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेज दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष अंबरें, विशाखा खेडेकर.
कायदेशीर बाजू
राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक अडवणे हे भारतीय दंड संहिता व राष्ट्रीय महामार्ग अधिनियमानुसार गुन्हा ठरू शकतो. मात्र सार्वजनिक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून प्रशासन व ठेकेदारांनी केलेली दिरंगाई हीदेखील शासनाच्या जबाबदारीतील गंभीर कसूर असल्याचा ठाम आरोप जनतेतून करण्यात येत आहे.
यावेळी जनआक्रोश समितीचे सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेज दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष अंबरें, हरिश बेगावले, विशाखा खेडेकर यांच्यासह संगमेश्वरचे युयुत्सु आर्ते, मनसेचे जितेंद्र चव्हाण, अशोक जाधव व तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

