( माणगाव )
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाटात शुक्रवारी सकाळी एक भीषण बस अपघात झाला. पुण्याहून माणगावच्या दिशेने जाणारी खासगी प्रवासी बस भरधाव वेगात घाटातील गारवा हॉटेल परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराला जोरात धडकली. या अपघातात सुमारे 52 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 5 ते 6 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, समोरून येणाऱ्या एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट डोंगरावर आदळली. धडकेनंतर बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की अनेक प्रवासी सीटमध्ये अडकले होते, तर काहींना गंभीर दुखापती झाल्या. अपघातानंतर बसमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस, स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना तत्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी गंभीर जखमी असलेल्या काही प्रवाशांना पुढील उपचारांसाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.

या अपघातामुळे ताम्हिणी घाट मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. घाटातील तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत असून, अपघाताचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
अपघातग्रस्त बसमध्ये भोसरी येथील महेंद्रा कंपनीतील कामगार प्रवास करत होते, अशी माहिती आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. वेळेवर मदतकार्य झाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र ताम्हिणी घाटातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

