(रत्नागिरी / प्रतिनिधी)
थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती, तालुका–जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत प्रशासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाद्वारे दोन प्रमुख मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
थिबा राजा कालीन बुद्धविहारासाठी आरक्षित असलेल्या १७.५० गुंठे जागेवर सुरू असलेले कम्युनिटी सेंटरचे बांधकाम तत्काळ रद्द करण्यात यावे, तसेच ही संपूर्ण आरक्षित जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावी, या त्या दोन मुख्य मागण्या होत्या. मात्र निवेदन सादर करून तब्बल दोन महिने उलटून गेले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही लेखी कार्यवाही अथवा उत्तर संघर्ष समितीस मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनावर नेमकी काय कार्यवाही करण्यात आली, याबाबत विचारणा केली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसांच्या आत माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, दिलेल्या कालावधीत प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने येत्या प्रजासत्ताक दिनी साखळी उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही समितीने दिला आहे. त्यामुळे या विषयावर आता प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात एल. व्ही. पवार, किशोर पवार, अमोल जाधव, सुनील आंबूलकर, दीपक जाधव, प्रकाश पवार, राजेंद्र कांबळे, दिवेन कांबळे, बी. के. पालकर, अजित जाधव, प्रदीप पवार, तुषार जाधव, मिलिंद सावंत, राजन जाधव, शिवराम कदम आदी मान्यवरांचा समावेश होता.

