(हैदराबाद)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी जगाच्या कल्याणासाठी हिंदू समाजाने आणि भारताने पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याच्या दिशेने काम करण्याचं आवाहन केलं आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू संघटनांच्या संमेलन असलेल्या विश्व संघ शिबिर (VSS) 2025 च्या समारोप समारंभात ते रविवारी बोलत होते.
भागवत म्हणाले की, हिंदू समाजाने केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतून आदर्श घालून नेतृत्व केलं पाहिजे. मानवी बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा वापर जागतिक कल्याणासाठी कसा करता येईल, हे दाखवून देणं ही आजची गरज आहे. तंत्रज्ञान प्रगत होईल, सोशल मीडिया वाढेल, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) येईल. मात्र तंत्रज्ञान मानवाचा मालक न होता मानवच तंत्रज्ञानाचा मालक राहिला पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मानवी बुद्धिमत्ता ही जगाच्या भल्यासाठी तंत्रज्ञान वापरण्याच्या दिशेने वाटचाल करेल, यासाठी संपूर्ण भारतीय समाजाने आदर्श जीवन जगणं आवश्यक असल्याचं भागवत यांनी सांगितलं. जगातील अनेक समाजांनी जास्तीत जास्त लोकांचं भलं साध्य करण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे हिंदू वंशाच्या लोकांनी असं जीवन जगावं की इतर समाज त्यांच्याकडून प्रेरणा घेतील, असंही त्यांनी नमूद केलं.
भारत किंवा हिंदू समाज सैन्यबळ किंवा आर्थिक शक्तीच्या जोरावर जगाचं नेतृत्व करणार नाही, असं स्पष्ट करत भागवत म्हणाले की, धर्म, संस्कृती आणि मूल्यांच्या आधारे जगाचं मार्गदर्शन करणं हीच भारताची भूमिका राहिली आहे. भारताला ‘विश्वगुरू’ बनणं ही कोणाची महत्त्वाकांक्षा नसून ती आजच्या जगाची गरज आहे. मात्र, यासाठी दीर्घकाळ कठोर परिश्रम करावे लागतील, असंही त्यांनी सांगितलं.
भागवत यांनी सांगितलं की, हजारो वर्षांपासून हिंदूंनी कोणत्याही देशावर विजय मिळवला नाही किंवा कोणाचा धर्म बदलला नाही. तरीही सभ्यता, गणित, आयुर्वेद आणि जीवनमूल्यांच्या माध्यमातून जगाला दिशा दिली. धर्माच्या ऱ्हासामुळे निर्माण झालेला असमतोल, अतिरेकीपणा आणि इतर जागतिक समस्या दूर करण्यासाठी पुन्हा समतोल प्रस्थापित करणं आवश्यक आहे, हे आज संपूर्ण जगाला उमगलं आहे.
विश्व संघ शिबिराची माहिती:
२५ डिसेंबर पासून हैदराबादजवळील कान्हा शांती वनम येथे सुरू झालेल्या या तीन दिवसीय विश्व संघ शिबिरात सुमारे २,००० प्रतिनिधी सहभागी झाले होते. हिंदू स्वयंसेवक संघ, हिंदू सेवा संघ, विश्व हिंदू परिषद आणि इतर आंतरराष्ट्रीय हिंदू संघटनांचे सदस्य व त्यांचे कुटुंबीय या शिबिरात उपस्थित होते.
विश्व संघ शिबिर दर पाच वर्षांनी आयोजित केलं जातं. यापूर्वी हा कार्यक्रम बंगळूरू, वडोदरा, मुंबई, गांधीनगर, पुणे आणि इंदूर येथे झाला आहे. VSS 2025 ची मुख्य संकल्पना ‘धर्मे सर्वं प्रतिष्ठितम्’ अशी असून, नवी दिल्लीस्थित ‘श्री विश्व निकेतन’ या संस्थेने या शिबिराचं आयोजन केलं आहे. ही संस्था परदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये भारतीय संस्कृती आणि वारशाचा प्रचार करण्यासाठी कार्यरत आहे.

