(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी मुंबईहून आलेल्या पर्यटकांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.अनिल लक्ष्मण पाथरे वय वर्षे ५७ राहणार साकीनाका, मुंबई असे या पर्यटकांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की साकीनाका मुंबई येथून अनिल लक्ष्मण पाथरे, दीपक पांडुरंग लाटे वय वर्षे ५४ व चंद्रकांत नामदेव विरखडे वय वर्षे ५८ असे तिघेजण गणपतीपुळे येथे १७ डिसेंबर रोजी देवदर्शन व पर्यटनासाठी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आले होते. यावेळी त्यांनी देवदर्शन व पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर रात्री गणपतीपुळे येथील एका खाजगी हॉटेलमध्ये जेवण आटोपल्यानंतर मुक्कामासाठी गणपतीपुळे येथील एका खाजगी लॉजवर ते गेले. या ठिकाणी गेल्यानंतर तीन जणांमधील अनिल पाथरे यांना अचानकपणे उलट्या व अशक्तपणा जाणवू लागला. यावेळी त्यांना तात्काळ त्यांच्या दोन मित्रांनी गणपतीपुळे येथील एका खाजगी दवाखान्यात नेले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांनी तात्काळ गणपतीपुळेनजीकच्या मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेले.
यावेळी त्यांची प्राथमिक तपासणी केली असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौ.पवार यांनी त्यांना मृत घोषित केले यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. याबाबत अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे क्षेत्राचे पोलीस कर्मचारी अनिल गुरव व संदीप साळवी करीत आहेत.

