(रत्नागिरी)
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय लोगो डिझाईन स्पर्धेत रत्नागिरी येथील ओंकार अनंत कोळेकर यांनी खुल्या गटातून द्वितीय क्रमांक पटकावत राज्यपातळीवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो कलाकार व डिझायनर्स सहभागी झालेल्या या स्पर्धेत कोकणातील तरुणाने मिळवलेले हे यश विशेष गौरवास्पद मानले जात आहे.
ही स्पर्धा मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकार झाली असून, शालेय, महाविद्यालयीन व खुला अशा तीन गटांमध्ये तिचे आयोजन करण्यात आले होते. कला, संस्कृती व राष्ट्रभक्तीचा संगम दर्शवणाऱ्या संकल्पनांना या स्पर्धेत प्राधान्य देण्यात आले.
या स्पर्धेतील लोगोचे परीक्षण मुंबईतील सुप्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथील नामवंत प्राध्यापकांनी केले. त्यामुळे या स्पर्धेला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली होती.
निवड करण्यात आलेल्या लोगोचे ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृत अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमास राज्यातील विविध मान्यवर, वरिष्ठ अधिकारी तसेच कला व डिझाईन क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
शिक्षण आणि व्यावसायिक वाटचाल
ओंकार अनंत कोळेकर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी चित्रपट निर्मिती (Filmmaking) चे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी जिओ स्टुडिओमध्ये काही काळ सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करत प्रत्यक्ष माध्यम क्षेत्राचा अनुभव मिळवला.
सध्या ते मुंबई विद्यापीठातून मास मीडिया (Mass Media) शिक्षण घेत असून, माध्यम, डिझाईन व सर्जनशील अभिव्यक्ती या क्षेत्रातील आपली शैक्षणिक व व्यावसायिक कौशल्ये अधिक भक्कम करत आहेत. याच दरम्यान त्यांनी ग्राफिक डिझायनिंगचे औपचारिक शिक्षण घेत विविध कंपन्या, कॅफे व रेस्टॉरंटसाठी ब्रँडिंग, लोगो डिझाईन आणि व्हिज्युअल आयडेंटिटी विकसित करण्याचे काम सुरू केले आहे.
राष्ट्रभक्तीचा आधुनिक डिझाईनमधून आविष्कार
‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करणाऱ्या त्यांच्या लोगोमध्ये राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक ग्राफिक डिझाईनचा प्रभावी संगम दिसून येतो. साधेपणा, अर्थपूर्ण प्रतीकात्मकता आणि प्रभावी सादरीकरणामुळे त्यांच्या लोगोची परीक्षकांकडून विशेष दखल घेण्यात आली.
या उल्लेखनीय यशाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागातून, कला, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रातून ओंकार कोळेकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, अनेक नवोदित विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.

