(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा आणि तालुका शाखा (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने सूर्यपुत्र तसेच यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता, खेडशी नाका येथे विजय कांबळे यांच्या निवासी सभा मंडळात, जिल्हाध्यक्ष आयु. अनंत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर, त्यांच्या एकमेव सुपुत्रांनी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांनी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून तब्बल २१ वर्ष प्रभावी नेतृत्व केले. बौद्ध समाजाचे धार्मिक, सांस्कृतिक व संघटनात्मक मार्गदर्शन करण्यामध्ये त्यांचे योगदान अनन्यसाधारण मानले जाते. १९६८ साली मुंबईत परमपावन दलाई लामा, देश-विदेशातील बौद्ध भिक्खू यांच्या सूचनेवरून त्यांनी बौद्ध जनतेसाठी ‘बौद्ध जीवन संस्कार पाठ’ हे महत्वाचे पुस्तक प्रकाशित केले. बौद्ध विधीसंस्कार पार पाडण्यासाठी बौद्धाचार्य वर्ग निर्माण करून त्यांनी बौद्ध समाजाला नवी दिशा दिल्याने त्यांना ‘बौद्धाचार्यांचे जनक’ म्हणून संबोधले जाते.
भैय्यासाहेबांनी स्वतः चिवर धारण करून श्रामणेर प्रवज्जा घेतली आणि पंडित काश्यप हे प्रवज्जित नाव धारण करून धम्माचा सखोल अभ्यास केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी महू येथून चैत्यभूमीपर्यंत भीमज्योत काढून धम्मदान गोळा करून दादर येथे चैत्यस्तुप उभारण्याचे महान कार्य त्यांनी केले. यामुळेच त्यांना चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणून मान्यता लाभली. चैत्यभूमीला धम्म प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्याचे श्रेयही त्यांचेच आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धम्मदीक्षा कार्यक्रम आयोजित करून त्यांनी बौद्ध समाजात जागृती निर्माण केली. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारितेच्या क्षेत्रांतही त्यांनी उल्लेखनीय योगदान देत बौद्ध समाजाला ठोस दिशा दिली.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी—एन. बी. कदम, प्रदिप जाधव, विजय जाधव, जनार्दन मोहिते, शरणपाल कदम, अल्पेश सकपाळ, विजय कांबळे, विजय मोहिते उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांमध्ये जयंती दिन साजरा करण्यात येणार असून, बौद्धाचार्य, श्रामणेर, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, तसेच उपासक-उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

