(रत्नागिरी)
भेटण्याचे निमित्त निवडायचे असेल तर भारतात क्रिकेटपेक्षा मोठ निमित्त नाही. क्रिकेट म्हणजे फक्त खेळ नाही तर एक एकात्मतेचा उत्सव आणि हेच निमित्त साधून रा.भा. शिर्के प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 30 वर्षांनी मैत्री चषक चे आयोजन केले होते. या स्पर्धेत १९९६,१९९७ आणि २००१ बॅच मधील माजी विद्यार्थांचे संघ सहभागी झाले होते. कोळंबे येथील सावंत ओॲसिस क्रिकेट मैदानावर या स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.
अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत १९९६ बॅच संघाने मानाचा गोल्डन कपचे विजेतेपद पटकावले आणि उपविजेते कप बॅच २००१ यांनी पटकावला तर १९९७ बॅच च्या संघाने सिल्व्हर कपचे विजेतेपद पटकावले.
या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा बॅच ९६चा ऋषिकेश भाटकर मालिकाविराचा मानकरी ठरला, बॅच २००१ चा कुणाल सावंत उत्कृष्ट गोलंदाज तर निलेश देवळेकर उत्कृष्ट फलंदाज ठरला तर संतोष शिंदे याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान पटकावला.
शाळेच्या जुन्या गणवेशात आलेले माजी विद्यार्थी, मधल्या सुट्टीत मिळणारा खाऊ आणि ३० वर्षांनी मित्रांना भेटण्याचे समाधान या सर्व जुन्या आठवणी व सुखद भावनेने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.
दरवर्षी मोठ्या दिमाखात ही स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा देखील सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणावेळी केली, पारितोषिक वितरण सोहळाला मैत्रीचा जल्लोष करण्यात आला.

