( नवी दिल्ली )
भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी सांगितले की मे २०२५ पासून सुरू असलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही प्रभावीपणे सुरू आहे. या ऑपरेशनदरम्यान भारतीय नौदलाच्या मजबूत तैनातीमुळे पाकिस्तानचे नौदल आपली जहाजे बंदरांबाहेर काढू शकले नाही आणि ते अरबी समुद्रातील मकरान किनारपट्टीपर्यंतच मर्यादित झाले, असे त्यांनी स्पष्ट केले.
नौदल प्रमुखांनी मंगळवारी, दिल्लीत झालेल्या वार्षिक पत्रकार परिषदेत सांगितले की, “गेल्या ७-८ महिन्यांपासून पश्चिम अरबी समुद्रात सतत ऑपरेशन सुरू आहे. यामुळे पाकिस्तानकडे जाणाऱ्या व्यापारी जहाजांच्या मार्गांवर परिणाम झाला असून त्यांच्या विमा प्रीमियममध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेजारील देशावर आर्थिक दबाव निर्माण झाला आहे.”
४३,३०० कोटींची अमली पदार्थ जप्ती
अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्याच्या मोहिमेत भारतीय नौदलाने राष्ट्रीय एजन्सींसह समन्वय साधत गेल्या वर्षभरात ४३,३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. “पहिले प्रतिसादक म्हणून आम्ही आमची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडत आहोत, आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे,” असे अॅडमिरल त्रिपाठी म्हणाले.
१२ नवी युद्धनौका नौदलात दाखल
नौदल प्रमुखांनी सांगितले की, एका नवीन पाणबुडीचा समावेश पंतप्रधानांनी १५ जानेवारी रोजी ट्राय-शिप कमिशनिंग कार्यक्रमात केला. गेल्या नौदल दिनानंतर १२ युद्धनौका भारतीय नौदलात सामील करण्यात आल्या. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आयएनएस उदयगिरी नौदलात दाखल झाल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, ही भारतीय नौदलातील १०० वी स्वदेशी युद्धनौका आहे.

