( रत्नागिरी /प्रतिनिधी )
जिल्ह्यातील सलग तीन हत्यांच्या उलगड्याने पोलिस यंत्रणा आणि सामान्य जनता देखील हादरून गेली. जयगड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सीताराम वीर व राकेश जंगम या दोन खून प्रकरणांचा तपास अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) नीलेश माईनकर यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. जयगड पोलिसांना वर्षभर उलटूनही राकेश जंगमच्या बेपत्ता प्रकरणाचा उलगडा करता आला नव्हता. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग केल्याने जयगड पोलिस ठाण्याच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दरम्यान, शहरालगतच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकर या तरुणीच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास मयेकर याने पोलिस चौकशीत धक्कादायक खुलासे केले. त्याने केवळ भक्तीचाच नव्हे, तर सीताराम लक्ष्मण वीर (५५, कळझोंडी, रत्नागिरी) व राकेश अशोक जंगम (२८, वाटद खंडाळा, रत्नागिरी) या दोघांचाही खून केल्याची कबुली दिली. दुर्वास याची प्रेयसी असलेल्या भक्ती मयेकरशी सीताराम वीर हे फोनवर अश्लील बोलत असत, असा संशय दुर्वासच्या मनात घर करून होता. २९ एप्रिल २०२४ रोजी सीताराम हे सायली बार येथे दारू प्यायला आले असताना दुर्वास पाटील, विश्वास पवार व राकेश जंगम यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. बेदम मारहाणीमध्ये गंभीर जखमी झाल्याने सीताराम यांचा मृत्यू झाला. मात्र, संशय टाळण्यासाठी दुर्वासने चलाखीने मृतदेह रिक्षामध्ये भरून त्यांच्या घरी नेला आणि “चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यू झाला” असा बनाव केला. कुटुंबीयांनी देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मृत्यू झाल्याचे निश्चित करून घेऊन सीताराम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राकेश जंगमचा काटा
सीताराम वीर खुनात सामील असलेला राकेश जंगम दारूच्या नशेत कधीतरी सत्य उघड करेल, अशी भीती दुर्वासला सतावत होती. त्यामुळे ६ जून २०२४ रोजी त्याने राकेशला “कोल्हापूरला जायचे आहे” असा बहाणा करून कारमध्ये बसवले. प्रवासादरम्यान दुर्वास, विश्वास पवार आणि सांगलीचा नीलेश भिंगार्डे यांनी मिळून राकेशचा गळा आवळून खून केला. मृतदेह थेट आंबाघाटात फेकून दिला. यानंतर बरेच दिवस राकेश घरी न परतल्याने आई वंदना जंगम यांनी २१ जून रोजी जयगड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र, जयगड पोलिसांना वर्षभर कसलाही सुगावा लागला नाही. सलग दोन हत्यांचा उलगडा करण्यात जयगड पोलिस पूर्णपणे अपयशी ठरले. या गंभीर प्रकाराची नोंद घेऊन पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने तपासाची सूत्रे एसडीपीओ नीलेश माईनकर यांच्या हाती दिली. त्यामुळे आता या रक्तरंजित हत्याकांडामागील अजून किती धक्कादायक धागे समोर येतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आरोपी न्यायालयीन कोठडीत
भक्ती मयेकर खून प्रकरणात अटक करण्यात आलेले दुर्वास पाटील, विश्वास पवार व सुशांत नरळकर यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला आहे.

