(रत्नागिरी)
रत्नागिरीचे भूषण मानले जाणाऱ्या टिळक आळीतल्या गणेशोत्सव मंडळाला भेट देत भाजपा नेते श्री विशाल परब यांनी कार्यकर्त्यांसोबत आज दर्शन घेतले. लोकमान्य टिळक, स्वा. सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत गणेशाचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले. शेतकऱ्यांच्या शेतात चांगले पीक होऊ दे आणि शासनाच्या योजना जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू दे, अशी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली आहे, अशी माहिती सावंतवाडीतील भाजपा नेते विशाल परब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
भाजपा नेते विशाल परब यांनी आज रत्नागिरीत अनेक गणरायांचे दर्शन घेतले. टिळक आळीचा यावर्षीचा शताब्दी गणेशोत्सव आहे त्याबद्दल त्यांनी ट्रस्टी मंडळींचे विशेष अभिनंदन केले. एवढी वर्षे मंदिर व्यवस्थापन आणि असा दिमाखदार उत्सव करणे, याबद्दल मंडळाचे कौतुकच केले पाहिजे. तसेच पारावर १०६ वर्षे दर शनिवारी चालणाऱ्या भजनाची खूप चांगली प्रथा, परंपरा चालू ठेवल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी प्रश्न विचारला असता जागरुक नागरिक मतदान करतात आणि त्यांना योग्य पक्ष वाटतो तिथे ते मतदान करत असतात. मात्र आजचा दिवस गणपतीचा आहे. त्यामुळे राजकारणावर बोलणार नाही. नंतर राजकीय भेटीगाठी घेईन, असे परब यांनी स्पष्ट केले. यानंतर परब यांनी रत्नागिरीचा राजा, श्री रत्नागिरीचा राजा, ओम साई मित्रमंडळ गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती विशाल परब यांनी रत्नागिरीत परत येऊन मान्यवरांच्या भेटी घेईन, असे सुतोवाचही याप्रसंगी केले. याप्रसंगी भाजपा नेते विशाल परब यांच्यासमवेत भाजपाचे ज्येष्ठ नेते ॲड. अनिल निरवडेकर तसेच मंडळाचे प्रभाकर करमरकर (ट्रस्टी), संजय तेरेदेसाई, सचिन करमरकर, संकेत बापट, पराग मुळ्ये यांच्यासमवेत भाजपाचे राजू भाटलेकर, श्री. सावंत आदी उपस्थित होते.

