(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडी बाजारपेठ भागातील पारंपरिक स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मार्गच नसल्याने ग्रामस्थांना अंत्यविधी करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेली तब्बल सत्तर वर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी आता ग्रामस्थ रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
मानवी साखळीतून शव वाहतूक
कडवई वाणीवाडी, बाजारपेठ आणि समर्थनगर भागातील रहिवाशांना अंत्यविधीसाठी कडवई तुरळ मार्गालगत नदीपलीकडील स्मशानभूमीचा वापर करावा लागतो. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने प्रचंड अडचणी निर्माण होतात. विशेषतः पावसाळ्यात मोठ्या पाण्यातून शव वाहून नेण्यासाठी तरुणांना मानवी साखळी करावी लागते. यावेळी अनेकदा ग्रामस्थ पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची धोकादायक परिस्थिती निर्माण होत असून काही तरुणांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळले आहेत.
न्यायालयीन वाद संपला, तरी रस्ता नाही
या स्मशानभूमीच्या जागेचा वाद काही काळ न्यायालयात प्रलंबित होता. आता ग्रामस्थांनी सामोपचाराने हा वाद निकाली काढला आहे. तरीदेखील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता आणि पूल नसल्याने नागरिकांची गैरसोय कायम आहे.
ग्रामस्थांचा इशारा
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे रस्ता आणि पूल बांधकामासाठी पत्रव्यवहार केला. मात्र न्यायालयीन वाद प्रलंबित असल्याचे कारण देत प्रस्तावाला केराची टोपली दाखवण्यात आली. आता तो अडथळा दूर झाला असल्याने प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन रस्ता व पूल उभारण्याची मागणी होत आहे. अन्यथा आपण लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
फोटो : पाण्याच्या प्रवाहातून मानवी साखळी करून शव नेताना ग्रामस्थ.

