(चिपळूण / रामदास धो. गमरे)
राजकारणात सत्ता ही अत्यंत महत्वाची असते, ज्या समाजाकडे सत्ता असेल तो समाजच आपले प्रश्न सरकार दरबारी नेऊ शकतो, त्याकरता आपल्या समाजातील कार्यकर्ते हे सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचले पाहिजेत. एक सामान्य कार्यकर्ता हा खरा लढवय्या योद्धा असतो. आपल्या रक्ताच पाणी करून तो पक्षाची सेवा करतो, परंतु जर त्याला सत्तेत जाण्याची संधीच दिली नाही तर काय फायदा ? आपल्या समाजाच्या हितासाठी आपले कार्यकर्ते सत्तेत जाणे आवश्यक आहे, २% लोकसंख्या असलेल्या समाजाच्या हाती आज सत्तेच्या चाव्या आहेत परंतु १२% लोकसंख्या असलेला आपला समाज सत्तेपासून कोसो दूर राहिला आहे. इतका मोठा आंबेडकरी समाज हा केवळ गटातटात विखरल्याने आजही आपण सत्तेपासून वंचित राहिलो आहोत, रिपब्लिकन पक्षांच्या त्याच त्याच धोरणांमुळे राजकीय चळवळीला नेहमीच अपयश येत राहील आहे. म्हणून आता त्या चौकटीतून बाहेर पडून कार्यकर्त्यांना नवीन संधी निर्माण करून देत त्यांना सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचवण्यासाठी शिवसेनेचशी युती करण्यात आली आहे, असे आपले स्पष्ट मत रिपब्लिकन सेना पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना व्यक्त केले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले असता सर्वच पक्ष आपले दंड थोपवटत आहेत. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच रिपब्लिकन पक्ष संघटना बळकट करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी रिपब्लिकन सेनाप्रमुख आनंदराज आंबेडकरांनी निवडणूकीच्या आखाड्यात शड्डू ठोकला असून त्यांनी यावेळी शिंदे गट शिवसेनेशी युती केली आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत समनव्य साधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मेळावा व सभा यांचे आयोजन करण्यात येणार असून त्याद्वारे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडवण्याचे काम करण्यात येईल जेणेकरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना साथ देत जोमाने कार्य करतील असा विश्वास व्यक्त केला.
तसेच गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता निर्माण करून पक्ष बळकट करण्यावर त्यांचा भर असून पक्ष संघटना बांधणीसाठी नव्याने कार्यकारिणी निवडण्यात येणार असून युतीच्या माध्यमातून शासकीय, अशासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याने तसेच शिवसेनेसोबत अनेक विषयांवर समझोता झाला असून आपल्या पक्षाला बऱ्याच ठिकाणी सामावून घेण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांनी आलेल्या संधीचे सोने करावे असे आवाहनही आनंदराज आंबेडकरांनी केले.
सदर मेळाव्या प्रसंगी वंचितचे माजी पदाधिकारी महेश सकपाळ, बुद्धघोष गमरे, विलास मोहिते, विलास जाधव, ऍड. सुयश जाधव, स्नेहा जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. सदर मेळाव्यास आनंदराज आंबेडकरांचे सुपुत्र ऍड. अमन आंबेडकर, कोकण प्रदेश अध्यक्ष विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपाध्यक्ष अशोक कांबळे, अनिरुद्ध कांबळे, गजानन तांबे, अशोक कणगोलकर, सरचिटणीस मिलिंद जाधव, चिटणीस मंगेश पवार, खजिनदार सुरेश मंचेकर, महेंद्र कांबळे, बौद्धजन पंचायत समितीचे खजिनदार नागसेन गमरे, बौद्धजन पंचायत समिती चिपळूण तालुका समन्वयक उत्तम जाधव, अध्यक्ष शांताराम जाधव आणि पदाधिकारी, सभासद त्याचबरोबर रत्नागिरी बौद्धजन पंचायत समिती चिटणीस सुहास कांबळे आणि सर्व पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सोबतच चिपळूण, मंडणगड, खेड, दापोली, संगमेश्वर, रत्नागिरी लांजा येथूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

