(रायगड)
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्गावरील वाहतूक अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून, अतिवृष्टीच्या दिवसांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पूर्वीच्या आदेशानुसार, सुरक्षिततेच्या दृष्टीने आंबेनळी घाट मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. तसेच पावसाळ्यात ऑरेंज व रेड अलर्ट असताना हलक्या वाहनांनाही बंदी होती. रात्रीच्या वेळी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली होती.
दरम्यान, कार्यकारी अभियंता (कोकण) महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने घाटरस्त्यावरील दुरुस्ती, मजबुतीकरण आणि अडथळे हटविण्याची कामे पूर्ण केली आहेत. रस्ता प्रवासासाठी सुरक्षित बनविण्यात आल्याने हा मार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. उपविभागीय अधिकारी महाड यांच्या अहवालाचा अभ्यास करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.
वरंध घाट मार्गही खुला
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडीवरील राजेवाडी–वरंध (रायगड जिल्हा हद्द) हा रस्ता देखील आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, अतिवृष्टीच्या दिवसांत हा मार्ग मात्र सुरक्षिततेसाठी बंद ठेवला जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे व भारतीय हवामान विभागाच्या हाय अलर्ट मुळे हा मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आगामी गणेशोत्सव लक्षात घेता स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी रस्ता सुरू करण्याची मागणी केली होती.
या मागणीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी, महाड यांच्या अहवालाचा अभ्यास करून जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
“अतिवृष्टीचा इशारा असलेल्या दिवसांत वरंध घाट मार्ग पूर्णतः बंद ठेवण्यात येईल. अशा वेळी स्थानिक पोलिस प्रशासनाने पुरेसा बंदोबस्त ठेवावा,” असे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.

