( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार शनिवारी (दि. १९ ऑगस्ट) जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जगबुडी नदीने खेड तालुक्यात धोक्याची पातळी ओलांडली असून, संगमेश्वरमधील शास्त्री व राजापूरमधील कोदवली नदीनेही इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संभाव्य धोक्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या सुट्टीचा लाभ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद, नगरपालिका, सरकारी व खाजगी शाळा, अनुदानित-विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा तसेच सर्व महाविद्यालये आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.मुसळधार पावसामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असून प्रशासनाने खबरदारीचे आवाहन केले आहे.

