(जैतापूर / राजन लाड)
मीठगवाणे येथे सागरी महामार्गावर आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, वाघ्रण येथून बागकामासाठी जानशी पठाराच्या दिशेने निघालेल्या महिलांचा टेम्पो समोरून जाणाऱ्या लक्झरी बसला ओव्हरटेक करत असताना चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो सुमारे 100 ते 150 फूट रस्त्याच्या कडेला पलटी मारत फरफटत गेला.
अपघातात टेम्पोतील सर्व महिला, एक लहान मुलगी, तसेच टेम्पोचालक आणि केबिनमधील इतर पुरुष प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींना तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले.
या अपघातात उपचारादरम्यान शीतल सोमा जाधव (वय ६०, रा. वाघ्रण) यांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्यांमध्ये सविता बबन जाधव (६०), शिल्पा शिवाजी आग्रे (६५), रंजना रविकांत राणे (४०), संतोष आबा नाचणेकर (३८), उद्या प्रकाश डिंगवकर (५०), वंदना वसंत जाधव (४०) सर्व रा. वाघ्रट यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याचे पथक, पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते २० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आणि स्थानिकांनी मिळून बचावकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास सागरी पोलीस करत आहेत.
108 रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमी रुग्णांना रत्नागिरी सिव्हिल येथे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 2 रुग्णांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात येणार आहे.