( जैतापूर / राजन लाड )
ग्रामपंचायत जवळेथर, प्राथमिक आरोग्य केंद्र जवळेथर व क्षयरोग पथक राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “टीबी मुक्त भारत अभियान” अंतर्गत एक दिवसीय क्ष किरण (एक्स-रे) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आज, मंगळवार, दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी पार पडलेल्या या शिबिराला पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात हातदे, अजिवली, मूर व ताम्हाणे या कार्यक्षेत्रातील 60 वर्षांवरील नागरिक, मधुमेही रुग्ण, पाच वर्षांपूर्वी क्षयरोग झालेल्या रुग्णांचे सहवासित, अशा धोकादायक गटातील 237 जणांची क्ष किरण तपासणी व CBNAAT (CYTB) चाचणी करण्यात आली.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जवळेथर गावच्या सरपंच श्रीमती अंजली मोरे, ग्रामपंचायत सदस्य विवेक मोरे, रेवती मोरे, तसेच कोळब गावचे सरपंच श्री शाहू पाटेकर, ताम्हाणे उपसरपंच रवींद्र सावंत हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे, डॉ. घाडगे मॅडम, आरोग्य सहाय्यक श्री कोटकर, श्रीमती नाईक, समुदाय आरोग्य अधिकारी हातदे, अजिवली, मूर, तसेच आशा गटप्रवर्तक श्रीमती मोरे व सर्व आशा वर्कर्स, आरोग्य सेविका व सेवक यांनी सक्रिय सहभाग घेतला.
जिल्हा क्षयरोग केंद्राचे पी.पी.एम. समन्वयक श्री. श्रीकांत सावंत, आरोग्य सहायक श्री मंगेश पाटील, क्ष किरण तंत्रज्ञ श्री निलेश हंगे, क्षयरोग पर्यवेक्षक श्री राहुल कोकणे, तसेच प्रयोगशाळा पर्यवेक्षक श्रीम. आचल मेलेकर हे तज्ज्ञ अधिकारी शिबिरासाठी विशेष उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जवळेथरचे सर्व कर्मचारी, आशा गटप्रवर्तक व आशा वर्कर्स यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच मोठ्या प्रमाणात तपासण्या करणे शक्य झाले. टीबीचे लवकर निदान व उपचार हाच टीबीमुक्त भारताचा पाया आहे, असे मत या वेळी वैद्यकीय अधिकार्यांनी व्यक्त केले.