( रत्नागिरी /प्रतिनिधी )
शहरातील ऐतिहासिक थिबाकालीन बौद्धविहाराच्या जागेवर कम्युनिटी सेंटर उभारण्याच्या जिल्हा प्रशासन आणि नगर परिषदेच्या प्रयत्नांना बौद्ध समाजाकडून तीव्र विरोध होत आहे. या वादग्रस्त निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (२८ जून) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे बौद्ध समाजाच्या संघर्ष समितीची विशेष बैठक पार पडली. यामध्ये “कम्युनिटी सेंटर म्हणजेच बुध्दविहार” असा खोटा प्रचार थोपवण्याचा प्रशासनाचा डाव हाणून पाडण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला.
थिबा राजाच्या काळातील तेथील जमिनीचे क्षेत्र बौद्धविहार हे ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून समाजासाठी महत्वाचे असून तिथे फक्त व फक्त बुध्दविहार म्हणूनच अस्तित्वात राहिले पाहिजे, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली. बुध्दविहाराची जागा बुध्दविहारासाठी राखीव असताना तेथे रत्नागिरी प्रशासन व रत्नागिरी नगर परिषद करू पाहत असलेले कम्युनिटी सेंटर हेच बुध्दविहार आहे असा कांगावा करीत आहेत. त्याबाबत नगर परिषदेने काढलेली वर्क ऑर्डरला दिवाणी न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेले असून संबंधित १७ गुंठे क्षेत्रामध्ये दिवाणी न्यायालयात दाखल असलेल्या दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत कोणतेही बांधकाम करू नये असा स्पष्ट स्थगिती आदेश न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते रत्नदीप कांबळे यांनी याच प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरकारतर्फे आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने उपस्थित राहिलेल्या वकिलांकडून मिळालेल्या आश्वासनाचा दाखला दिला. बुद्ध विहाराचे कोणत्याही प्रकारे नुकसान केले जाणार नाही आणि रत्नागिरी नगर परिषदेचा विद्यमान बुद्ध विहाराचे कोणत्याही प्रकारे नुकसान न होता लगतच्या क्षेत्राचा विकास करण्याचा मानस आहे असे स्पष्ट करण्यात आले. या आश्वासनामुळे समाधान व्यक्त करत न्यायालयाने याचिका निकाली काढली. तथापि, या निकालाचा विपर्यास करून बौद्ध समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात असल्याचा आरोप समितीकडून करण्यात आला.
बैठकीत लढ्याचे रूपांतर कायदेशीर पातळीपासून रस्त्यावरच्या लढाईपर्यंत नेण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. “बौद्ध समाजाच्या माथी कम्युनिटी सेंटर लादले जाणार नाही. शासनाचा डाव हाणून पाडण्यासाठी समाज सज्ज आहे,” असा स्पष्ट इशाराही बैठकीत देण्यात आला.