(रत्नागिरी)
शहरातील पेठकिल्ला भाटकरवाडा येथे दोन दिवसांपूर्वी तीन दुचाकी जाळल्याप्रकरणी फिर्याद देणारा निहाल मकसूद मुल्ला (३६, रा. भाटकरवाडा पेठकिल्ला, रत्नागिरी) हाच संशयित आरोपी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलिसांनी त्याला शनिवारी रात्री उशिरा अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गुरुवारी रात्री साडेबारा ते शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या कालावधीत अज्ञाताने पेठकिल्ला भाटकरवाडा येथील अंगणात पार्क करून ठेवलेल्या ऍक्सेस, ऍक्टिव्हा आणि बुलेट या तीन दुचाकी जाळल्या होत्या. यात एकूण १ लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
शहर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर फिर्यादी निहाल मुल्ला यानेच या तिन्ही दुचाकी जाळून या सर्व प्रकाराला दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी आगळीक केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी संशयित निहालला शनिवारी रात्री अटक केली.