( रत्नागिरी /प्रतिनिधी )
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील पुलाजवळील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून, अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार मंगेश मधुकर भस्मे (वय ४४, रा. पाली, गराटेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज शनिवारी (दिनांक २८ जून २०२५ ) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला.
दुचाकीस्वार भस्मे हे पालीहून रत्नागिरीकडे जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हातखंबा येथील वळणावर समोरून येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला (गाडी न. MH 08AL0670) जोरदार धडक दिली. धडक इतकी जबर होती की, भस्मे यांच्या दुचाकीचा चक्काचूर होऊन ते जागीच कोसळले. अपघातानंतर धडक दिलेल्या अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे समजते. या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्ग वाहतूक केंद्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील मॅडम, पो. हेडकॉन्स्टेबल गमरे, हेडकॉन्स्टेबल दोरखंडे, पोलीस कॉन्स्टेबल शिंगाडे आदी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत सुरू ठेवली. दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस देखील दाखल होऊन पुढील तपास सुरु आहे.
मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. अपघातग्रस्त वळण आणि प्रशासनाच्या ढिसाळ भूमिकेबाबत वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असून, नागरिकांच्या जिवाशी खेळ चालू आहे का? असा संतप्त सवाल वाहनचालक, नागरिकांमधून विचारला जात आहे.
त्या वाहनाचा शोध घेऊन कठोर कारवाई करा
मंगेश भस्मे हे रत्नागिरीतील एक नामांकित प्रिंटर मेकॅनिक होते. त्यांच्या मृत्यूमुळे मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने अज्ञात वाहनाचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दुर्घटनेमागे महामार्ग प्रशासनाचा हलगर्जीपणा
मुंबई-गोवा महामार्गाचे हातखंबा-पाली दरम्यानचे काही भाग काँक्रीटीकरण झाले असले तरी उर्वरित भागात मोठ्या प्रमाणावर रस्ते खड्डेमय आणि धोकादायक स्थितीत आहेत. ठेकेदार ‘ईगल कंपनी’कडून कामाच्या दर्जाबाबत सातत्याने तक्रारी असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अपघातांचे सत्र सुरूच आहे. हातखंबा परिसरात लागोपाठ दोन धोकादायक वळणे अनेक अपघातांसाठी कुप्रसिद्ध असून, तेथील अरुंद रस्ता, चिखलयुक्त वळण, खड्डे आणि पावसामुळे वाढलेली धोकादायकता यामुळे वाहनचालकांचे जीव टांगणीला लागले आहेत. त्यातच आता ठेकेदार कंपनीने नव्याने निर्माण केलेले महाविद्यालया जवळील चढणीचे वळण अपघातांना निमंत्रण देत आहे.