(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या चौपदरीकरणाच्या कामांमुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. शास्त्रीपुल परिसरातील रस्ता खचण्याच्या प्रकरण शांत होत नाही तोच, आता संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथेही काँक्रीट रस्त्यावर भलेमोठे खड्डे आणि तशाच मोठ्या भेगा पडल्याचे समोर आले आहे. महामार्गाचे रस्त्याचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
“एक ना धड भाराभर चिंध्या!”
बावननदी ते आरवली दरम्यान चालू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाचा दर्जा अत्यंत खालावलेला असून, ठेकेदार कंपनी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा गलथान आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. पावसाची काही सरी पडताच रस्त्यावरील निकृष्ट कामाचे ‘पितळ’ उघडे पडू लागले आहे. काँक्रीट रस्त्यावर तीन-चार इंचांपासून अर्धा फूट रुंदीच्या भेगा पडल्या असून, त्यातून पाणी झिरपून रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. “एक ना धड भाराभर चिंध्या ” अशी महामार्गाची सध्या अवस्था झाली आहे.
रस्त्याच्या दर्जाची कसून पाहणी कोठेच नाही!
काम सुरु असताना कुणीही यंत्रणेकडून दर्जा तपासला नाही, की कामावर लक्ष ठेवले नाही. यामुळेच आज सर्वसामान्य नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. आरवलीतील अपुऱ्या कामाचे विदारक चित्र पाहता, हे ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांनी जनतेला फसवण्याचे कारस्थान केल्यासारखेच वाटते. शास्त्रीपुलावरील भेगा, कुरधुंडा येथील कोसळण्याच्या मार्गावर असलेली संरक्षण भिंत आणि आता आरवलीतील भग्न रस्ता, हे सगळे ठेकेदारांच्या बेजबाबदार कारभाराची जिवंत उदाहरणे आहेत.
प्रशासनाच्या दुर्लक्षाचा रोष होणार जनतेच्या अंगावर
असेच गैरप्रकार सुरू राहिले, तर लवकरच नागरिकांचा असंतोष उफाळून बाहेर पडेल. प्रशासनाने आता तरी जागे होऊन, तातडीने या रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करावी. अन्यथा, नागरिकांचा रोष थोपवणं प्रशासनासाठी कठीण होईल. प्रत्येक पावसाळ्यात अशीच स्थिती उद्भवत असेल तर महामार्गाचा ‘राष्ट्रीय’ दर्जा शाबित राहणार की नाही, हा प्रश्नही उपस्थित होतो.
या महामार्गाचे दर्जेदार, सुरक्षित आणि दीर्घकालीन उपयोगासाठी निर्माण होणे ही केवळ ठेकेदारांची जबाबदारी नाही, तर प्रशासनाचीही जबाबदारी आहे. रस्त्याच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता योग्य नियोजन, देखरेख, आणि अंमलबजावणी या प्रत्येक टप्प्यावर दक्षता बाळगणे आवश्यक आहे. कारण हा महामार्ग केवळ एक रस्ता नसून, लाखो नागरिकांचा दैनंदिन प्रवास, आर्थिक व्यवहार, तसेच आपत्कालीन सेवांशी थेट संबंधित आहे. जर या कामात वेळेवर योग्य हस्तक्षेप न केला, आणि अक्षम्य दुर्लक्ष केले गेले, तर भविष्यात केवळ मालमत्तेचे नुकसानच नाही, तर निष्पाप नागरिकांच्या जीवितहानीचीही मोठी किंमत समाजाला मोजावी लागू शकते. त्यामुळे यंत्रणांनी वेळेवर जागं होऊन ठोस कृती करणे हे अत्यंत आवश्यक आणि अपरिहार्य आहे.