( चिपळूण )
मुंबई-गोवा महामार्गालगतच्या कामथे नदीत टँकरद्वारे सांडपाणी सोडल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चिपळूणमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) संबंधित साफयीस्ट कंपनीवर कडक कारवाई करत उत्पादन तात्काळ थांबवण्याची नोटीस बजावली आहे. यासोबतच वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेशही महावितरण आणि एमआयडीसीला देण्यात आले आहेत.
हा प्रकार समोर आल्यानंतर शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी थेट चिपळूणमधील एमपीसीबी कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला. त्यानंतर एमपीसीबीच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि संबंधित कंपनीच्या प्रदूषणविषयक गंभीर निष्काळजीपणाची नोंद घेतली. कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडून एमपीसीबीचे अधिकारी निखील घरत यांनी कंपनीला पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा, १९७४ अंतर्गत ‘क्लोजर नोटीस’ बजावली आहे. निरीक्षणात असे आढळले की, कंपनीने परवानगी नसताना जास्त पाणी वापरले असून, बॉयलरसाठी इंधन देखील नियमबाह्यपणे बदलले. बॅग फिल्टरही निकृष्ट स्थितीत होता. याशिवाय परवानगीशिवाय टँकरद्वारे सांडपाणी नदीत सोडल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.
घटनेच्या वेळी स्थानिक ग्रामस्थांनी पाईपद्वारे नदीत सोडले जात असलेले मळीसदृश सांडपाणी पाहिले. त्यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. मात्र, संबंधित टँकर चालक तेथून पळून गेला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.
वीज व पाणीपुरवठाही बंद होणार
प्रदूषण नियंत्रण मंडळाने साफयीस्ट कंपनीवर कारवाईचा बडगा उगारताच महावितरण व एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना कंपनीचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चिपळूण येथील उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पर्यावरणाला धोका; पूर्वीही तक्रारी
या कंपनीविरोधात यापूर्वीदेखील प्रदूषणाबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र, या वेळी साक्षात सांडपाणी नदीत सोडताना आढळून आल्याने वातावरण अधिकच तापले आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून, या प्रकरणात कठोर कार्यवाही व्हावी, अशी मागणी होत आहे.