(रत्नागिरी)
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न झाले. सोमवारपासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली असून, या ऐतिहासिक दिवशी खंडपीठासमोर मांडण्यात आलेल्या पहिल्याच खटल्यात युक्तिवाद करण्याचा मान रत्नागिरीचे ज्येष्ठ ॲडव्होकेट राकेश भाटकर यांना मिळाला.
या दिवशी प्रशासकीय न्यायमूर्ती मा. न्या. मकरंद कर्णिक व मा. न्या. शर्मिला देशमुख यांनी सर्किट बेंचचे पहिले खंडपीठ म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांच्यासमोर ॲड. भाटकर यांचे प्रकरण पटलावर आले होते. या खटल्यात रत्नागिरीतील रहिवासी श्री. जय कदम यांनी कोल्हापूर येथील पोलिस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांच्या क्रेनची अनधिकृत विक्री व मुलाला झालेल्या पोलिस मारहाणीचा उल्लेख होता. तसेच संबंधित प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणाबाबतही त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या खटल्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाधिवक्ता ॲड. बिरेंद्र सराफ यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंकडून सखोल सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने शासनाला दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.
कोल्हापूर सर्किट बेंचच्या सुरूवातीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांतील नागरिकांना न्यायप्रवेश अधिक सुलभ होणार आहे. या ऐतिहासिक दिवशी पहिल्या खटल्याचा युक्तिवाद करण्याचा मान आपल्या जिल्ह्याचे ॲड. राकेश भाटकर यांना लाभला, ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

