(संगमेश्वर)
अवघ्या वर्षभरातच संगमेश्वर-वाशी रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, गोपाळवाडी परिसरातील मोरीवरचा खोल खड्डा वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खचून तयार झालेला हा खड्डा रात्रीच्या अंधारात सहज लक्षात येत नाही, त्यामुळे अपघात होण्याचा धोका अधिकच वाढला आहे.
नुकत्याच झालेल्या डांबरीकरणाच्या कामानंतर काहीच महिन्यांत या रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण होणे ही कामाच्या दर्जावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरत आहे. विशेषतः मोरीच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जमीन सरकली असून, त्यामुळे वाहनचालकांसाठी हा भाग अडथळ्याचा ठरत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या गंभीर समस्येबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अपघाताचा धोका अधिकच गडद झालेला आहे. गोपाळवाडी परिसर हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असून, या ठिकाणी अपघात झाल्यास गंभीर अनर्थ ओढवू शकतो, अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.
“प्रशासनाने या भागाची तातडीने पाहणी करून मोरीची दुरुस्ती आणि रस्त्याचा भराव करून योग्य उपाययोजना करावी,” अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तडजोडीच्या कामकाजामुळे रस्त्यांचे आयुष्यच कमी होत असल्याचे या उदाहरणावरून पुन्हा स्पष्ट होत आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन कृती करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.