( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी गावात गुरुवारी सकाळी एका मृत बिबट्याचा सापडलेला देह परिसरात एकच खळबळ उडवून गेला. गावालगतच्या पायवाटेशेजारी हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला असून, मानेवर असलेल्या खोल जखमेमुळे दोन बिबट्यांमध्ये झालेल्या झटापटीत त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
पांगरीतील रहिवासी सुहास जोशी गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता धरणाकडे जात असताना त्यांना रस्त्यालगत हा बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्यांनी तातडीने गावचे सरपंच सुनील म्हादे यांना याबाबत माहिती दिली. यानंतर वनविभागासहीत स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी परिक्षेत्राचे वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वरचे प्रभारी वनपाल न्हानू गावडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृत बिबट्याची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी सरपंच सुनील म्हादे, पोलीस पाटील श्वेता कांबळे, तसेच निलेश मुळे व संतोष कांबळे उपस्थित होते.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून, अंतिम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या बिबट्याचा अंत्यसंस्कार वनविभागाच्या देखरेखीखाली करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, हा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे दोन वर्षांचा होता.
जंगलतोडीचा दुष्परिणाम? नागरिकांमध्ये चिंता वाढली
या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. “जंगलतोड वाढत असल्याने वन्यप्राणी आता अधिवास सोडून मानवी वस्तीत शिरत आहेत”, अशी प्रतिक्रिया वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाने याबाबत गांभीर्याने लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात आणि जंगल व वन्यजीवांचे अस्तित्व जपावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.