(मुंबई)
पावसाळा सुरू होताच चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध सुरू लागतात. यासाठी चाकरमानी गणेशोत्सवास गावी जाण्याचे नियोजन करण्यास सुरूवात करतात. यामध्ये महत्वाचे नियोजन असते ते गावी जाण्यासाठी रेल्वे किंवा एसटी बसचे आरक्षण करणे. यासाठी रेल्वे प्रशासन दोन महिने आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करते.
गणेशोत्सवाला चाकरमानी किमान आठ दिवस अगोदर गावी जातात. या वर्षी श्री गणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट रोजी आहे. म्हणजे यावर्षी गणपतीसाठी गावी जाणारे चाकरमानी 19 ऑगस्ट पासून गावी जायला सुरूवात करतील. म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनी दोन महिने अगोदर म्हणजेच 20 जून रोजी आपल्या इच्छीत गाडीचे आरक्षण करणे आवश्यक आहे.
गेल्यावर्षी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन शनिवार ७ सप्टेंबर- २०२४ रोजी झाले होते. यावर्षी १२ दिवस अगोदर म्हणजे बुधवार दि. २७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. त्यामुळे ६० दिवसआधी आगाऊ आरक्षणाच्या तारखांचा चार्टखालील प्रमाणे असणार आहे. यंदाही मध्य रेल्वे कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल गाड्यांना सोडणार आहे. गेल्यावर्षी मध्य आणि पश्चिम रेल्वेने अडीचशे अधिक स्पेशल गाड्या कोकणात सोडल्या होत्या. या शिवाय एसटी महामंडळाने देखील २००० हून अधिक जादा बसगाड्यांची तजवीज केली होती.
आरक्षण दिनांक – प्रवासाचा दिनांक
२३ जून, सोमवार – २२ ऑगस्ट, शुक्रवार
२४ जून, मंगळवार – २३ ऑगस्ट, शनिवार
२५ जून, बुधवार – २४ ऑगस्ट, रविवार
२६ जून, गुरुवार – २५ ऑगस्ट, सोमवार
२७ जून,शुक्रवार – २६ ऑगस्ट, मंगळवार – हरितालिका
२८ जून, शनिवार – २७ ऑगस्ट, बुधवार – श्री गणेश चतुर्थी
२९ जून, रविवार – २८ ऑगस्ट, गुरुवार – ऋषी पंचमी
३० जून, सोमवार – २९ ऑगस्ट, शुक्रवार
०१ जुलै, मंगळवार – ३० ऑगस्ट, शनिवार
०२ जुलै, बुधवार – ३१ ऑगस्ट, रविवार – गौरी आगमन
०३ जुलै, गुरुवार – ०१ सप्टेंबर, सोमवार – गौरी पूजन
०४ जुलै,शुक्रवार- ०२ सप्टेंबर, मंगळवार – गौरी गणपती
खरेतर गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासन नियमीत गाड्यांबरोबरच शेकडो विशेष गाडया कोकण रेल्वे मार्गावर सोडते. मात्र, या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच पहिल्या एक-दोन मिनिटातचं संपूर्ण गाडीचे आरक्षण फूल्ल होते. कधीकधी तर तिकीट खिडकीवर पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रवाशालाही संबधित गाडीचे कर्फम तिकीट मिळत नाही. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासूनची ही समस्या कायम आहे. दुसरीकडे खासगी तिकीट एजंटकडे याच गाड्यांची तिकीटे सहज उपलब्ध होतात. मात्र, त्यासाठी मूळ तिकीटाच्या दामदुप्पट दर आकारला जातो. तासनतास् रांगेत राहूनही जे तिकीट प्रवाश्याला मिळत नाही ते एजंटला सहज कसे मिळते? यामागचे गौडबंगाल काय? प्रवाशांची खुलेआम लूट करणारा हा गोरख धंदा कुणाचा? रेल्वे प्रशासनाचे यावर काहीच नियंत्रण नाही कसे? अवघ्या एका मिनिटात संपूर्ण रेल्वेची हजारो तिकीट कशी आरक्षित होतात? लोकप्रतिनिधी याबाबत आवाज का उठवत नाहीत? याबाबत रेल्वे प्रशासन कधी खुलासा का करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न कोकणवासींय रेल्वे प्रवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पडलेले आहेत. मात्र याचे योग्य उत्तर कुणीच देत नसल्याने कोकणवासींय प्रवाशांच्या नशिबी गुराढोरा प्रमाणे रेल्वे डब्यात कोंबून घेत प्रवास करण्याची परवड कायम आहे.
यंदाही मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासन विशेष गाड्यांची तयारी करत आहेत. गेल्या वर्षी मध्य व पश्चिम रेल्वेने मिळून २५० पेक्षा अधिक स्पेशल गाड्या कोकणात सोडल्या होत्या. यासोबतच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) २००० हून अधिक अतिरिक्त बससेवा पुरवण्यात आली होती.
रेल्वे तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांनी आरक्षणाची तारीख लक्षात ठेवून सकाळी लवकर ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष पद्धतीने तिकीट बुक करावे, अन्यथा तिकीट मिळवणे अत्यंत कठीण ठरू शकते.