(मुंबई)
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून राजकीय खेळी खेळली गेली आहे. एसटी सहकारी बँकेचे १८ पैकी तब्बल १२ संचालक आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सदावर्ते यांना शह देण्यासाठी ‘ऑपरेशन लोटस’ रणनीती राबवली जात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या घडामोडींमुळे फडणवीस–शिंदे युतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अॅड. सदावर्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक सर्वज्ञात असून, त्यामुळे शिवसेना व भाजप यांच्यात सुसंवादात अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
सदावर्ते दांपत्यांचे संचालकपद रद्द
दरम्यान, सहकार खात्याने अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार खात्याकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे सदावर्ते दांपत्याला मोठा धक्का बसला असून, त्याचे पडसाद राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.
बँकेतील कारभार, आर्थिक व्यवहार आणि अंतर्गत तणाव यामुळे काही महिन्यांपासून ही संस्था चर्चेत होती. संचालकपदावरून हटवण्यामागची नेमकी कारणमीमांसा सहकार विभागाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी काही विशिष्ट राजकीय दबावामुळे ही कारवाई झाली असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
या घडामोडींमुळे सहकार क्षेत्रात तसेच भाजप-शिवसेना युतीमध्ये नव्या तणावाची चिन्हं निर्माण झाली आहेत. उपलब्ध माहितीनुसार, मंगळवारी सदावर्ते यांच्या ताब्यात असलेल्या ST बँकेचे काही संचालक यांनी मंत्री उदय सामंत यांची मुंबईत भेट घेतली होती. बैठकीदरम्यान बँकेतील अंतर्गत मतभेद, विशेषतः सदावर्ते यांचा मेव्हणा सौरभ पाटील यांच्याविरोधातील नाराजी यामुळे संचालकांनी सदावर्ते यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांची डावपेचपूर्ण भूमिका यशस्वी झाल्याचीही जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवार सायंकाळी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संचालकांचा शिवसेनेत औपचारिक प्रवेश होणार आहे.
राजकीय भूकंपाची शक्यता
या सर्व घडामोडीमुळे राज्याच्या सत्तास्थानी असलेल्या शिंदे–फडणवीस युतीत नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे. संचालकांची फोडाफोड, त्यातून उद्भवलेले राजकीय संकेत आणि सदावर्ते यांच्या निष्कासनाची वेळ–या सर्व गोष्टी एकत्र पाहता, पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले जातात. आता १२ संचालकांच्या सेना प्रवेशाने भाजप आणि सेनेमध्ये पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता आहे.