(चिपळूण)
चिपळूण-संगमेश्वरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम आणि राष्ट्रवादीचे संस्थापक नेते शरद पवार यांची नुकतीच मुंबईत झालेली भेट सध्या कोकणात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. भेटीचा विषय कृषी तंत्रज्ञानातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) असला तरी, त्याआड नव्या राजकीय समीकरणांची तयारी सुरू असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
शरद पवार हे माजी केंद्रीय कृषी मंत्री म्हणून कृषी क्षेत्राशी संबंधित योजनांबाबत सजग आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना AI तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांना चर्चेसाठी बोलावले, अशी अधिकृत माहिती आहे. मात्र, या भेटीचा राजकीय संदर्भ लक्षात घेता, ती केवळ कृषीपुरती मर्यादित आहे का, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे निकम हे आमदार आहेत. 2024 च्या निवडणुकीत शरद पवार गटाकडून प्रशांत यादव यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली होती. प्रचारासाठी शरद पवार स्वतः चिपळूणात दाखल झाले होते. त्यामुळे दोघांमध्ये वैचारिक अंतर स्पष्टपणे जाणवत होते.
मात्र, आताच्या या अनपेक्षित भेटीने दोन्ही गटांतील दुरावा कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये समेटाच्या शक्यता अधूनमधून चर्चेत आल्या आहेत. शरद पवार यांचे कोकणात अद्यापही मजबूत जनाधार आहे. अशा परिस्थितीत शेखर निकम यांच्यासारख्या स्थानिक नेत्याशी पुन्हा संपर्क वाढवण्यामागे दूरगामी राजकीय गणित असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘कृषी’ निमित्त, राजकीय घडामोडी?
कृषी क्षेत्रातील AI वापर ही चर्चा वरकरणी तांत्रिक वाटत असली, तरी अशा प्रकारची चर्चा सार्वजनिक झाली की, त्यामागे अधिक महत्त्वाचे राजकीय संकेत असतात, हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे सूत्र आहे. एका ज्येष्ठ राजकीय विश्लेषकाच्या मते, शरद पवार कोणालाही सहजतेने चर्चेसाठी बोलावत नाहीत. जर त्यांनी शेखर निकम यांना वैयक्तिकरित्या आमंत्रण दिले असेल, तर त्यामागे केवळ कृषी नाही, तर रणनीती असू शकते.
पार्श्वभूमीवर विधानसभा 2029?
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याची शक्यता राजकीय चर्चेत अनेकदा ऐकू आली आहे. विशेषतः कोकणसारख्या संवेदनशील भागात स्थानिक नेतृत्वाची मुळे घट्ट असताना, पवार-निकम भेट ही निव्वळ सुसंवादापुरती मर्यादित राहील का, की ती आगामी राजकीय घडामोडींचा प्रारंभ ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.