(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील तनाळी पैकी राधाकृष्णवाडी (ता. चिपळूण) येथील विहीरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाच्या पथकाने सुखरूप सुटका करत त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. सकाळी ९ वाजता सौ. सनवी सुरज बाईत यांना त्यांच्या घरामागील विहीरीत बिबट्या पडलेला दिसला. त्यांनी पोलीस पाटील श्री. राजेश थरवळ यांना माहिती दिली, आणि त्यानंतर वन विभागाला तात्काळ सूचित करण्यात आले.
वनपरिमंडळ अधिकारी श्री. एस. एस. सावंत यांच्या नेतृत्वाखाली वन परिमंडळ अधिकारी (फिरते पथक) श्री. जी. एम. पाटील, वनरक्षक दत्ताराम सुर्वे, राहुल गुंठे, अनंत मंत्रे आणि वाहनचालक नंदकुमार कदम व संजय अंबोकर यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्यात सक्रिय सहभाग घेतला. आधुनिक पिंजऱ्याच्या मदतीने अवघ्या अर्ध्या तासात बिबट्याची सुटका करण्यात आली.
बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. कणसे यांनी तपासणी केली. विहिरीत पडलेला मादी बिबट्या सुमारे २ ते २.५ वर्षांची असून ती पूर्णपणे निरोगी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या समक्ष बिबट्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
या यशस्वी मोहिमेस विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एस. एस. खान यांचे मार्गदर्शन लाभले. वन विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, मानवी वस्तीत वन्यप्राणी आढळल्यास त्वरित विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा.