(मुंबई)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत होणारी तीव्र वाहतूककोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चार पर्यायी मार्ग विकसित करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पर्यायी मार्गांची यादी पुढीलप्रमाणे:
-
मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे
-
साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गाव रस्ता
-
निजामपूर कालवा ते भादाव रस्ता
-
इंदापूर कॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता
ही चारही मार्ग माणगाव नगरपंचायत व मुंबई–गोवा महामार्ग क्षेत्रात येत असून, वाहतुकीस पर्यायी सुलभ मार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहेत.
महामार्गाच्या प्रगतीसाठी उच्चस्तरीय बैठक
उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीत अजित पवार दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी उपस्थित होते. १८ मे रोजी रायगड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामार्गाची प्रत्यक्ष आणि हवाई पाहणी केली होती. त्यानंतर दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी म्हणून मंत्रालयात ही बैठक पार पडली. बैठकीत चर्चा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “ज्या कामांसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून निधी उपलब्ध होत नाही, त्यासाठी राज्य शासन स्वतः निधी उपलब्ध करून देईल. वाहतूककोंडी ही नागरिकांची दैनंदिन अडचण असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी
वाहतूककोंडी टाळण्यासाठी अधिक मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचना रायगडचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. वाहतुकीच्या सुरक्षित आणि सुरळीत व्यवस्थेसाठी यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले. ही उपाययोजना पूर्णत्वास गेल्यास मुंबई–गोवा महामार्गावरील प्रवाशांना सुटकेचा निःश्वास घेता येईल, असे स्पष्ट संकेत यामधून मिळत आहेत.