(रत्नागिरी)
रत्नागिरी नूतन एस.टी. बसस्थानकाचे उद्घाटन झाले असले तरी बसस्थानकासमोरील अतिक्रमण व वाहतूक कोंडीमुळे गंभीर समस्या निर्माण होत आहेत. या मार्गावर हातगाड्या, टपर्या व बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक सुरळीत राहिली नाही, परिणामी एका वृद्ध व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी एस.टी. आगारप्रमुखांनी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
या पत्राची प्रत रत्नागिरी नगर परिषदेलाही देण्यात आली असून, बसस्थानकाच्या समोरील अतिक्रमण तातडीने हटवण्याचे सूचित करण्यात आले आहे. यापूर्वी दोन दिवसांसाठी हातगाड्या बाजूला करण्यात आल्या होत्या, त्यामुळे रस्ता मोकळा झाला होता. परंतु उद्घाटनानंतर पुन्हा अतिक्रमण परत आले असून, एस.टी. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे. एस.टी. चालकांकडूनही या रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतुकीस मोकळा मार्ग मिळावा, अशी मागणी सातत्याने होत आहे.
बसस्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू
रत्नागिरी नूतन एस.टी. बसस्थानकातून दररोज सुमारे १,००० फेर्या सुरू असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत शहर पोलीस ठाणे व मुख्यालयामार्फत पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती एस.टी. आगार व्यवस्थापक श्री. प्रद्युन्म शिरधनकर यांनी दिली.
या चौकीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व प्रवाशांचे सुरक्षा प्रश्न मार्गी लागले आहेत. कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारांवर नियंत्रण ठेवणे, तक्रारी तत्काळ ऐकणे आणि आवश्यक ती कारवाई करणे शक्य झाले आहे. ग्रामीण व शहर बसस्थानकातील शिस्त आणि सुव्यवस्था राखण्यात ही चौकी मोलाची ठरणार आहे.