( रत्नागिरी /प्रतिनिधी )
राज्यात आपत्कालीन आरोग्यसेवेतील मोठी घोडदौड सुरू झाली असून, १०८ रुग्णवाहिका सेवेअंतर्गत राज्यभरात तब्बल १ हजार ७५६ अत्याधुनिक रुग्णवाहिका कार्यान्वित होणार आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘आयसीयू बालरुग्णवाहिका’ उपलब्ध होणार असून, ही सेवा लवकरच सुरू होणार आहे.
राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांतील रुग्णांना तातडीने आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम करण्यात आली आहे. नवीन उपक्रमाअंतर्गत अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असलेल्या या रुग्णवाहिकांमुळे उपचारपूर्व सेवा आणखी प्रभावी होणार आहे.
या नवीन रुग्णवाहिकांमध्ये डॉक्टर आणि प्रशिक्षित निम्न वैद्यकीय कर्मचारी तैनात असणार आहेत. त्याचबरोबर प्राणवायू सुविधा, अत्याधुनिक स्ट्रेचर, हृदयविकार निदान व उपचारासाठी उपकरणे, आणि नवजात बालकांसाठी विशेष सेवा उपलब्ध असणार आहे. या रुग्णवाहिका बेसिक लाइफ सपोर्ट (BLS), ॲडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट (ALS), निओनटल केअर युनिट (NICU), दुचाकी आणि बोट रुग्णवाहिका अशा विविध स्वरूपात असणार आहेत.
राज्यात पाच टप्प्यांत अंमलबजावणी; १,६०० कोटींची गुंतवणूक
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून, त्यासाठी सुमारे १ हजार ६०० कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक करण्यात येणार आहे. हा उपक्रम सार्वजनिक-खासगी भागीदारीतून राबवण्यात येणार असून, आरोग्य प्रशासनाकडूनही यास मान्यता मिळाली आहे.
रत्नागिरीसाठी विशेष ‘आयसीयू बालरुग्णवाहिका’
लहान बालकांवरील आपत्कालीन उपचारांसाठी विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याला ‘निओनटल आयसीयू’सह सुसज्ज बालरुग्णवाहिका दिली जाणार आहे. त्यामुळे गर्भवती माता, नवजात शिशू आणि गंभीर स्थितीतील बालकांवर तत्काळ उपचारांची सोय होणार आहे. या नव्या उपक्रमामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार असून, आपत्कालीन स्थितीत “१०८” हाच जीवनरक्षक दुवा ठरणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज रुग्णवाहिका
- मोबाईल डाटा टर्मिनल (MDT): रुग्णाची माहिती थेट रुग्णालयात पाठवणारी प्रणाली.
- वैद्यकीय टॅबलेट: त्वरित तपासणी व निदानासाठी संगणक प्रणाली.
- RFID-GPS यंत्रणा: रुग्णवाहिकेचे थेट लोकेशन मिळवणारी ट्रॅकिंग सुविधा.
- ट्रायएज सिस्टीम: रुग्णाच्या स्थितीनुसार उपचारांची प्राथमिकता निश्चित करणारी यंत्रणा.